Sadabhau Khot March
Sadabhau Khot March sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara News : सदाभाऊंची शेतकरी पदयात्रा स्थगित; मंत्री सावे, दरेकरांचे आश्वासन

Umesh Bambare-Patil

Satara News : शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली निघालेली कराड ते मंत्रालय ‘वारी शेतकऱ्यांची’ ही पदयात्रा सहकारी मंत्री अतुल सावे व प्रवीण दरेकर यांच्या आश्वासनानंतर साताऱ्यातून स्थगित करण्यात आली. येत्या पंधरा दिवसांच्या आत मंत्रालयात बैठक घेवून मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले. दरम्यान, पदयात्रा साताऱ्यात येत असताना सदाभाऊ खोत यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवराज पंपाजवळ महामार्गावर ठिय्या मारला. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली.

दोन साखर कारखान्यातील २५ किलोमीटरचे अंतर कमी करावे, ऊस वाहतुकदारांचे मुकादमांनी बुडवलेले पैसे परत मिळावेत, गुजरातच्या धर्तीवर ऊसाला चार हजार रुपये दर द्यावा, कृषी कर्जासाठी सिबीलची सक्ती रद्द करावी, तुकडे बंदी कायदा रद्द करावा, शेतकऱ्यांना शेतमाल कोठेही विकता यावा, आदी मागण्यांच्या माध्यमातून सरकारला जागे करण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत Sadabhau Khot यांनी कराड karad येथील प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळास अभिवादन करून पदयात्रा काढली होती.

आज या यात्रेचे साताऱ्यात आगमन झाले. खिंडवाडीतून यात्रा महामार्गाच्या कडेने शिवराज पेट्रोल पंपावर जवळ आली. यावेळी सदाभाऊंसह संघटनच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाचे आमच्या मागण्यांकडे दूर्लक्ष होत असल्याचे कारण देत महामार्गावर ठिय्या मारला. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिस अधिकाऱ्याने सदाभाऊंपुढे हात जोडले, त्यानंतर पदायात्रा पुढे मार्गस्थ झाली. बॉम्बे चौकातून यात्रा पोवईनाक्यावर आली.

येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.आता सरकारपर्यंत आमच्या मागण्या न गेल्यास आम्ही वाहनाने मुंबईपर्यंत जाणार असून सरकारमधील काही मंत्री आमच्याशी चर्चा करण्यासाठी येत असून त्यानंतरच पुढील दिशा ठरवली जाईल, असे सदाभाऊ यांनी सांगितले.

त्यानंतर सहकार मंत्री अतुल सावे आणि प्रवीण दरेकर यांच्यासोबत सदाभाऊ खोत व संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक झाली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आदी उपस्थित होते. संघटनेच्या मागण्यांबाबत येत्या पंधरा दिवसांच्या आत मंत्रालयात बैठक घेवून मागण्यांचा विचार करुन सकारात्मक निर्णय घेतला जाईल.

आता सरकार आपल्या दारी ही शासनाची योजना राज्यभर सुरु आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत आपल्या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय होईल, असे आश्वासन सहकार मंत्री अतुल सावे, आमदार प्रविण दरेकर यांनी श्री. खोत यांना दिल्याने हे आंदोलन स्थागित करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT