shirdi sanshtan
shirdi sanshtan Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

साईबाबा, शिर्डीतील वाहतूक पोलिसांना सुबुद्धी द्या!

प्रकाश पाटील

अहमदनगर - साईबाबांच्या समाधीसमोर नतमस्तक होण्यासाठी भाविक येतात. त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची जबाबदारी येथील वाहतूक पोलिसांचीही आहे की नाही? भाविकांनी वाहतूक शिस्त पाळली पाहिजे. चुकले तर त्यांना दंडही आकारला पाहिजे, याबाबत दुमत नाही. मात्र, भाविकांची अडवणूक होता कामा नये. ( Saibaba, give wisdom to the traffic police in Shirdi! )

मुंबई, पुणे असो, की नगर, शिर्डी; प्रत्येक ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. प्रत्येक ठिकाणी पार्किंगचा प्रश्न असतोच. गाडी कुठे पार्क करायची, पोलिस येतील का, दंड होईल का, ही पार्किंगची जागा आहे की नाही, हे प्रश्‍न शहरात किंवा मोठ्या देवस्थानच्या ठिकाणी जाताना पडत असतात.

जो गाडी चालवितो, तो ट्रॅफिकमध्ये घामाघूम होतो. एकदा का गाडी सुरक्षित पार्क झाली, की त्याला हायसे वाटते. ट्रॅफिक ही जटिल समस्या आहे, हे आता सांगण्याचे कारण असे, की साईबाबांच्या शिर्डीतील वाहतुकीचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. येथे देशभरातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात. कोरोनाच्या काळात मंदिर बंद असल्याने येथे भाविक येत नव्हते. भाविकच नसल्याने त्याचा परिणाम हॉटेलिंगसह सर्वच व्यवसायांवर झाला होता. आता कुठे कोरोनाची तिसरी लाट ओसरू लागल्याने भाविक काही प्रमाणात शिर्डीत दाखल होत आहेत.

साईसंस्थान नेहमीच सज्ज

भाविकांसाठी साईसंस्थान नेहमीच सज्ज असते. दर्शन सुलभ व्हावे. राहण्यासाठी संस्थेच्या भव्य इमारती, ऑनलाइन पासची व्यवस्था, प्रशस्त प्रसादालय आहे. आज शिर्डीत काय नाही हो? वाहतूक पोलिसांनीही थोडे सबुरीने घ्यायला हवे. चूक असेल तर वाहनचालकांना दंड करणे वेगळे आणि दंड करण्यासाठी चूक शोधणे वेगळे. शिर्डीत त्याचा अतिरेक झाल्याने ग्रामस्थ संतप्त झालेत. कुठली तरी चूक शोधून पोलिस दंड करतात. एका भाविकाची गाडी त्यांच्या कुटुंबासह अडवून धरली. दहा हजारांची मागणी केली. हजार रुपयांवर सौदा पटला. दोनशे रुपयांची दंडाची पावती आणि आठशे रुपये पोलिसांनी खिशात घातले, असा आरोप एका भाविकाने ग्रामसभेत मोबाईलवरून बोलताना केला. आजूबाजूच्या गावांतील शेतकऱ्यांची मुले कामासाठी, फुले व अन्य शेतमालाच्या विक्रीसाठी रोज शिर्डीत ये-जा करतात. त्यांचीही अडवणूक होत असल्याच्या तक्रारी आहेत.

भाविकांशी सौजन्याने वागा

म्हणूनच माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनीही, वाहतूक शाखा भाविकांच्या सुविधेसाठी आहे की त्यांना लुटण्यासाठी, असा सवाल उपस्थित केलाय. रोगापेक्षा औषध भयंकर अशी स्थिती झाल्याने, ही वाहतूक शाखाच बंद करा, असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला. इतर ठिकाणांहून आलेल्या भाविकांशी थोडे सौजन्यानेही वागण्याची गरज आहे. दंड आकारा, पण अवाच्या सव्वा दंड आकारून चालणार नाही. दंड पाहून भाविकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आणू नका. शिर्डीतील वाहतूक पोलिसांविषयीच्या तक्रारींबाबत सर्वच माध्यमांनी आवाज उठविला.

विखे पाटील का संतापले?

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील तर या मुद्द्यावर संतप्त झाले आहेत. ...तर मला दंडुका हातात घ्यावा लागेल, असा इशाराच त्यांना वाहतूक पोलिसांना द्यावा लागला. विखे पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यालाही असा इशारा का द्यावा लागतो, याचा विचार वाहतूक पोलिसांनी करावा. सोलापूर-नगर ते शिर्डी, नाशिक ते शिर्डी, औरंगाबाद ते शिर्डी आणि मालेगाव ते शिर्डी या सर्वच रस्त्यांवर ठिकठिकाणी साईभक्तांच्या गाड्या अडवून पोलिस त्यांना त्रास देतात, ही फार जुनी तक्रार आहे. आजही हे प्रकार सुरूच आहेत. ते तातडीने थांबावेत, अशी अपेक्षा आहे.

पोलिस अधीक्षकांनी लक्ष घालावे!

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील हे एक अनुभवी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. ते जेथे गेले, तेथे त्यांनी कामाचा ठसा उमटविला. पुण्यातील वाहतुकीला तर त्यांनी अशी शिस्त लावली आहे, की पुणेकर अजूनही विसरले नाहीत. त्यांनी शिर्डीतील वाहतुकीला, तसेच तेथील वाहतूक पोलिसांनाही थोडी शिस्त लावावी, असे त्यांना नम्र आवाहन आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT