Sambhaji Raje- Abhijeet Patil
Sambhaji Raje- Abhijeet Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sambhajiraje's offer to Abhijeet Patil : संभाजीराजेंची अभिजीत पाटलांना ऑफर : ‘तुम्हाला आमदार करण्याची जबाबदारी आमची...’

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : अभिजीत पाटील (Abhijeet Patil), तुम्ही आता इकडं-तिकडं फिरत बसू नका, थेट ‘स्वराज्य’ संघटनेत या. तुम्हाला आमदार (MLA) करण्याची जबाबदारी आमची. आम्हाला तिकिट द्या; म्हणून कुठल्या पक्षाकडे जाण्याची दिवस आता गेले आहेत. आलेली संधी कधी सोडायची नसते, अशा शब्दांत संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhajiraje) यांनी विठ्ठल सहकार साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना ऑफर दिली. (Sambhaji Raje's offer to Abhijeet Patil)

पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे एका रुग्णालयाच्या उद्‌घाटन समारंभात संभाजीराजे बोलत होते. त्याच कार्यक्रमात त्यांनी अभिजित पाटील यांना स्वराज्य संघटनेत येण्याची ऑफर दिली. या वेळी आमदार बबनराव शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते. पाटील यांनीही विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंच्या ऑफरला महत्व आहे.

संभाजीराजे म्हणाले की, माझा खासदारकीचा कालावधी संपून आता एक वर्ष होत आले आहे. मात्र, सूत्रसंचालन करणाऱ्याने मला खासदार करून टाकले. त्यांनी ठरवून टाकलं होतं की संभाजीराजेंना खासदारच म्हणायचं आपण. पण, मी आता खासदारकीपेक्षाही मोठं बघायला लागलो आहे. (या वेळी राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांनीही टाळ्या वाजवल्या) बघा, बबनदादांनीही टाळ्या वाजवल्या. कारण आता स्वराज्याची स्थापना झालेली आहे. स्वराज्य हे राजकारणात येणार आहे.

बबनदादा हे काय आमच्याकडे येणार नाहीत, याची आम्हाला कल्पना आहे. त्यांनी आमच्याकडे येऊसुद्धा नये. कारण, पाच टर्म कोणाबरोबर एकत्र राहिलेल्या दादांनी आमच्याकडे येणे बरं नाही. आम्ही तशी मागणीसुद्धा तुमच्याकडे करणार नाही. पण, दादा तुम्हा आम्हाला ज्येष्ठत्वाचा सल्ला देऊ शकता. तोच ज्येष्ठत्वाचा सल्ला तुमच्या शेजारी बसलेल्या अभिजित पाटील यांनाही देऊ शकता. तुम्ही इकडं-तिकडं फिरू नका. थेट स्वराज्यमध्ये या. तुम्हाला आमदार करण्याची जबाबदारी आमची. आम्हाला तिकिट द्या; म्हणून कुठल्या पक्षाकडे जाणे, हे दिवस गेलेत आता. विश्वास संपला आहे, असे संभाजीराजे यांनी नमूद केले.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, महाराष्ट्रात जे काही चाललंय ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. माझ्यात आणि बबनदादांमध्ये काय चर्चा झाली, ती मी जाहीरपणे सांगणार नाही, पण, तेसुद्धा म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या जे काही चाललंय, ते काही बरोबर नाही. काय बरोबर चालंल नाही, ते मी सांगू शकणार नाही, बबनदादाच कधीतरी मूड आल्यावर सांगू शकतील. सध्या महाराष्ट्रात बरोबर चाललं नाही. पण, बरोबर चालावयचं असेल तर आगामी २०२४ च्या निवडणुकीत स्वराज्य निश्चित येणार आहे.

अभिजित पाटील तुम्ही आज बरोबर सापडला आहात. आलेली संधी कधी सोडायची नसते, ही शिवाजी महाराजांची शिकवण आहे. चांगली लोक गोळा करून त्यांना ताकद द्या, असे महाराजांनीच सांगितले आहे. सरसेनापती आहेत म्हणून तीनशे वर्षे त्यांच्याच पिढ्याला तेच पद दिले पाहिजे, असं नाही. जो कर्तृत्वाने मोठा आहे, जो कार्य करतो, काम करतो, त्याला ताकद द्या, असे महाराजांनी सांगितले आहे. शिवाजी महाराजांप्रमाणे स्वराज्य निर्माण करण्यासाठी चांगली लोक निवडण्यासाठी हा संभाजीराजे २० वर्षे महाराष्ट्र पिंजून काढत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT