पश्चिम महाराष्ट्र

Sangli Congress MLA : सांगलीच्या आमदारांची पंतप्रधानांनाही धास्ती..! काँग्रेस नेत्याचा दावा...

Anil Kadam

Sangli Political : जत तालुक्याला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. सत्ताधारी भाजप सरकारने सिंचन योजना पूर्ण करण्याचे गाजर दाखवले, प्रत्यक्षात पाणी प्रश्न सुटायला तयार नाही. जतवरचा दुष्काळाचा शिक्का पुसण्याची धमक काँग्रेसमध्ये असल्याचा विश्वास माजी मंत्री व आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वाला जतकरांनी जपायला तर हवेच, पण ते वाढविण्याची जबाबदारीही स्वीकारावी, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. (Sangli Congress MLA)

जत येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात आमदार पाटील बोलत होते. यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील (Vishal Patil), अथणीचे चिदानंद सवदी, डॉ. जितेश कदम, शिवाजीराव काळुगे, बयाजी शेळके, मनोज सरगर, बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे, सरदार पाटील, ॲड. युवराज निकम, बाबासाहेब कोडग, मारुती पवार उपस्थित होते.

सतेज पाटील (Satej Patil) म्हणाले, विधिमंडळात आम्ही सावंत यांचे काम जवळून पाहतो. ते पायाला भिंगरी लावून काम करतात. पाणी, विकासाचे प्रश्न घेऊन मंत्री, अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करतात. प्रत्येक अधिवेशनात पोटतिडकीने जनतेचे प्रश्न मांडून विकासनिधी पदरात पाडून घेतात. पाण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्याशी समन्वय ठेवत कसरतीची कामगिरी चांगल्याप्रकारे पार पाडत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी विशाल पाटील म्हणाले, पंतप्रधानांना सांगलीची धास्ती वाटते. आज जिल्ह्यात आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत यांच्यासह सारेच एकजुटीने विकासकामे करत आहेत. विक्रमदादांनी विस्तारित आणि म्हैसाळ योजनेसाठी कणखर भूमिका घेऊन काम केले. त्यामुळे विरोधकांना पंतप्रधानांना पुढे करावे लागत आहे. सांगलीचे खासदार गायब आहेत. त्यांनी काहीही उठावदार काम केले नाही. प्रतीक पाटील यांनी 1 हजार कोटी आणले, त्यातूनच ही कामे झाली आहेत.

जतच्या प्रश्नासाठी 20 वर्षांपासून संघर्ष

आमदार सावंत म्हणाले, जतच्या प्रश्नासाठी 20 वर्षांपासून संघर्ष करत आहे. म्हैसाळ योजना पूर्ण करून घेतली, विस्तारित योजनेची कामे सुरू झाली. सरकार कोणतेही असले तरी अधिकचा निधी आणू शकलो. यापुढेही काम अविरत सुरू राहील. आज राज्यात व देशात जाणिवपूर्वक अन्यायाची भूमिका सुरू आहे. जातीजातीत तेढ निर्माण केली जात आहे. याचा विचार आपण लोकसभा व विधानसभेला करायला पाहिजे. यापुढेही काँग्रेसवर तालुक्याचे प्रेम राहील, असे त्यांनी सांगितले.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT