सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत चुरस वाढली आहे.
विश्वजीत कदम यांनी सांगली पॅटर्न राबवण्याचा दावा करत महायुतीतील नाराज गट आपल्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील बॅकफूटवर गेल्याचे चित्र असून अध्यक्षपदाची लढत प्रतिष्ठेची ठरली आहे.
sangli News : सांगली जिल्हा परिषदेवर महायुतीमधून भाजप अध्यक्ष पदावर दावा करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये अंतर्गत चुरस निर्माण झाली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसने आग्रही भूमिका घेत जो सन्मानाने सव्वा वर्ष अध्यक्ष पद देईल त्यालाच पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादीच्या या घोषणेनंतर आता महायुतीतील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. त्यातच काँग्रेस नेते आमदार विश्वजीत कदम यांनी सांगली जिल्हा परिषदेमध्ये सांगली पॅटर्न करण्याचा दावा करत गुगली टाकली आहे. त्यांनी, महायुती मधील नाराज गट आपल्या संपर्कात असून लवकरच अध्यक्ष आमचाच होईल असा दावा केला आहे. यामुळे सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली असतानाच मंत्री चंद्रकांत पाटील बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे. तर काँग्रेस नेते विश्वजीत कदम महायुतीतील अंतर्गत वाद कॅश करण्याच्या तयारीत दिसत आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सहा सदस्य असून त्यांची भूमिका सत्ता स्थापनेत महत्त्वाची ठरणार आहे. मात्र त्यांनी जो पक्ष आपल्याला पहिल्यांदा सव्वा वर्ष अध्यक्षपद देईल, त्याच्यासोबत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव कोण मान्य करणार, याकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे भाजपने देखील आता वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे.
जिल्हा परिषदेत प्रत्येक पक्षाला गटाला आपला अध्यक्ष व्हावा, असे वाटते. ते साहजिक आहे. त्यामुळे सध्या ज्या घडामोडी घडत आहेत, त्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत," असे प्रतिपादन नुकतेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी करत एक पाऊल मागे घेतले आहे.
जिल्हा परिषदेची निवडणूक होऊन तीन आठवड्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र अद्याप सत्ता कोणाची येणार, याबाबत स्पष्टता नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार काँग्रेस आणि शिवसेना उभाठा यातील पक्षांचे ३० सदस्य असून त्यांना सत्ता स्थापनेसाठी एका सदस्याची गरज आहे, तर भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे ३१ सदस्य असले तरी हे तिन्ही पक्ष स्वतंत्र लढले असल्याने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट वरिष्ठांच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे भाजपच्या हालचालीकडे सर्वांचे लक्ष आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेण्याच्या हालचाली मुंबई पातळीवर सुरू आहेत. स्थानिक गट जागा वाटपाच्या दिवसांपासूनच भाजपवर डोक धरून आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसने आता वेगळा प्रस्ताव ठेवल्यानंतर भाजप 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहे. त्यामुळे सध्या ज्या घडामोडी घडत आहेत, त्या आम्ही पाहत आहोत," असे त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट करत जिल्हा परिषद सत्ता स्थापनेबाबत आज कोणतीही बैठक झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांमधील दरी आणखी रुंदावल्याचे संकेत आहेत.
1. सांगली जिल्हा परिषदेत वाद का निर्माण झाला आहे?
अध्यक्षपदावर दावा करताना महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद वाढले आहेत.
2. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय आहे?
जो सन्मानाने सव्वा वर्ष अध्यक्षपद देईल त्यालाच पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे.
3. विश्वजीत कदम यांनी काय दावा केला आहे?
महायुतीतील नाराज गट आपल्या संपर्कात असून अध्यक्ष आमचाच होईल, असा दावा केला आहे.
4. भाजपसाठी ही निवडणूक का महत्त्वाची आहे?
सत्तास्थापनेसाठी ही लढत प्रतिष्ठेची बनली असून भाजपची प्रतिमा पणाला लागली आहे.
5. पुढे काय होण्याची शक्यता आहे?
महायुतीतील अंतर्गत चर्चेनंतर सत्ता स्थापनेचे समीकरण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.