Sanjeev Bhor
Sanjeev Bhor Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

संजीव भोर म्हणाले, राहाता तालुक्यातही परिवर्तन अटळ...

सुहास वैद्य

कोल्हार ( अहमदनगर ) : राहाता तालुका हा भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) व त्यांच्या कुटुंबीयांचा बालेकिल्ला समजला जातो. या राहाता तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP ) आपले वर्चस्व निर्माण करू पाहत आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजीव भोर यांनी महत्त्व वक्तव्य आज बाभळेश्वर (ता. राहाता) येथे केले. Sanjeev Bhor said, change is inevitable even in Rahata taluka ...

खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बाभळेश्वर येथे राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यकर्ता शिबिरात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे शिबिर घेण्यात आले. श्रीरामपूर दूध जिल्हा संघाचे अध्यक्ष रावसाहेब म्हस्के व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुधीर म्हस्के यांच्या विशेष पुढाकारातून घेण्यात आलेल्या या शिबिराला पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात कार्याध्यक्ष संदीप वर्पे, राष्ट्रवादी काँग्रेसचे वक्ता प्रशिक्षण विभागाचे नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष सिद्धांत बोराळे, कोल्हारचे माजी सरपंच ॲड. सुरेंद्र खर्डे, रमेश गोंदकर, अलका कोते, अमित शेळके, बाबासाहेब कोते, नीलेश कोते, सखाराम चौधरी आदींचा समावेश होता.

संजीव भोर म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आवाज व ताकद देशाला माहिती आहे. त्यांच्याच पाठबळावर नगर जिल्हा राष्ट्रवादीमय झाला आहे. राहाता तालुक्यातही परिवर्तन अटळ आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या बीजाचे रोपटे उभे करण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. निष्ठावान व लढवय्या सामान्य कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचे काम पदाधिकाऱ्यांनी करावे, असे आवाहन भोर यांनी केले.

ते पुढे म्हणाले, की रात्रीतून पक्ष बदलणारे काही नेते या तालुक्यात आहेत. त्यांची धनशक्ती, दडपशाही व हुकूमशाही आपल्याला टिकू देईल का. पक्ष आपल्याला संरक्षण देईल का असा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला न्यूनगंड दूर करावा लागेल. गेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील कोपरगाव, अकोले, पारनेर, कर्जत-जामखेड तालुक्यात परिवर्तन झाले. राहाता तालुक्यातही त्याची पुनरावृत्ती होईल.

अरुण कडू म्हणाले, पंडित नेहरू व महात्मा गांधींप्रमाणेच दुर्दैवाने शरद पवारांचीही प्रतिमाभंजन करण्याचे काम काही शक्तींकडून सुरू आहे. त्याला तशाच प्रकारे प्रत्युत्तर देण्याचे काम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावे. पवारांचे राजकीय, सामाजिक व विकासात्मक पैलू जनतेपुढे न्यावे.

सुधीर म्हस्के यांनी पक्षाने कार्यकर्त्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांच्यामागे भक्कम पाठबळ उभे करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचा फायदा राहाता, शिर्डी नगरपरिषदेप्रमाणेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत होईल.

या प्रसंगी सखाराम चौधरी, सिद्धांत बोराळे, नीलेश कोते, भागवत आरणे, शशिकांत लोळगे, प्रसाद महाले आदींची भाषणे झाली. प्रास्तविक व सूत्रसंचालन दत्तात्रेय निर्मळ यांनी केले. अमित शेळके यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT