Satara, 02 March : सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचे युतीचे आवाहन धुडकावून लावून भाजपने स्वबळावर लढवली होती. या निवडणुकीत भाजपकडून महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टोकाची टीका केली होती. निवडणुकीच्या प्रचारात धारदार शब्दांत टीका करणाऱ्या भाजप नेत्यांची भाषा बदलली आहे. बहुमत न मिळाल्याने भाजपकडून महायुतीचा दाखल देत सातारा जिल्हा परिषदेत एकत्र काम करण्यासाठी मित्रपक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न सुरू आहे
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी महायुती म्हणून एकत्र काम केलं पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. पण सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपचाच झाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानंतर आज कराडचे आमदार अतुल भोसले (Atul Bhosale) यांनीही शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपने महायुती म्हणून एकत्र आलं पाहिजे, अशी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे, असे म्हटले आहे.
ते म्हणाले, सातारा (Satara) जिल्ह्याने महायुतीला अभूतपूर्व असे यश दिलेले आहे. जिल्हा परिषदेच्या ६५ जागांपैकी २८ जागा एका अपक्षासह भारतीय जनता पक्षाला मिळाल्या आहेत. वीस जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेल्या आहेत, तर शिवसेनेला १५ जागा मिळाल्या आहेत. विरोधात फक्त काँग्रेस पक्षाला एक जागा मिळालेली आहे. त्यामुळे उर्वरीत सर्व जागा ह्या महायुतीच्या विचाराच्या निवडून आलेल्या आहेत.
महायुती म्हणून राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असे आम्ही एकत्र काम करत आहोत. भविष्य काळातही सरकार एकत्रिपणे चांगल्या पद्धतीने चालविण्याचा प्रयत्न तीनही पक्षांचा असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहे, असा दावाही आमदार भोसले यांनी केला.
अतुल भोसले म्हणाले, आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की, महायुती म्हणून एकत्रितपणे आपण सर्वांनी काम करावं, अशी आमची इच्छा आहे. शेवटी वरच्या पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यामध्ये चर्चा होऊन योग्य तो तोडगा होईल. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे विषय आहेत, त्यावर वरिष्ठ पातळीवरून तोडगा काढला जाईल. त्याची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या पातळीवर सातारा जिल्ह्यातही निश्चितपणे होईल.
सातारा जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याचा दावा केला जात आहे, या प्रश्नावर आमदार अतुल भोसले यांनी उत्तर देताना वरिष्ठ पातळीवर त्याबाबत पॉलिसी ठरेल आणि निर्णय होईल, असे स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.