Eknath Shinde
Eknath Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

साताऱ्याने दिला महाराष्ट्राला चौथा मुख्यमंत्री

Umesh Bambare-Patil

सातारा : राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर सत्तांतर होत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्याच गळ्यात भाजपने मुख्यमंत्री पदाची माळ घातली आहे. एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील दरे गावचे सुपूत्र असल्याने सातारकरांना याचा वेगळा अभिमान आहे. यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर आता एकनाथ संभाजी शिंदेच्या रूपाने साताऱ्याने चौथा मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सातारा जिल्ह्यातील सुपूत्रांचे वेगळे नाव राहिले आहे. यशवंतराव चव्हाण यामध्ये अग्रभागी आहेत. त्यांच्यानंतर बाबासाहेब भोसले हे मुख्यमंत्री झाले होते त्यांचे मुळगाव कलेढोण (ता. खटाव) असून ते बॅरिस्टर होते. अतुलेंनी राजीनामा दिल्यानंतर अल्पकाळासाठी श्री. भोसले हे मुख्यमंत्री झाले होते. त्यांच्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारच्या काळात कराडचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यांच्यानंतर आता जावळी तालुक्यातील दरे तांबे गावचे कट्टर शिवसैनिक असलेले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहेत.

मुळचे दरे तांबे गावचे असलेले एकनाथ शिंदे यांनी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात प्रवेश केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारांनी आणि ओजस्वी वाणीने भारावलेल्या पिढीचा तो काळ होता. ठाण्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळी शिवसेनेच्या झेंड्याखाली जमा होत होती.

अशा वातावरणात एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. आनंद दिघे यांनी १९८४ मध्ये किसननगर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली. तेव्हापासून श्री. दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला. गोरगरीब जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देणे, टंचाईच्या काळात पामतेल उपलब्ध करून देणे, नागरी समस्यांविरोधात सरकार व प्रशासनाविरोधात केली जाणारी आंदोलने यातही एकनाथ शिंदे आघाडीवर असायचे.

१९८६ साली सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या १०० कार्यकर्त्यांसह भाग घेतला होता. त्यावेळी बेल्लारी येथील तुरुंगात त्यांना ४० दिवस कारावास झाला होता. आता भाजप, एकनाथ शिंदे शिवसेना गटाच्या माध्यमातून सत्तेत येणाऱ्या सरकारमध्ये ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. सातारा जिल्ह्याने त्यांच्या रूपाने चौथा मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिला आहे.

असा आहे शिंदेंचा प्रवास...

एकनाथ शिंदे हे शिवसेना नेते असून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) या खात्यांचे कॅबिनेट मंत्री होते. या आधी २०१५ ते २०१९ पर्यंत एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम या खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. २०१९ च्या सुरुवातीपासून त्यांनी आरोग्य खात्याची देखील जबाबदारी सांभाळली. ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते सलग तीन वेळा (२००९, २०१४ आणि २०१९) आणि तत्पूर्वी पूर्वीच्या एकत्रित ठाणे विधानसभा मतदारसंघातून एकदा (२००४) असे चार वेळा आमदार झाले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे ते १९८० च्या दशकात शिवसेनेत दाखल झाले. एका साध्या शाखाप्रमुखापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली आणि कठोर मेहनत, धडाडी, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती आणि प्रत्येक कामाला शेवटापर्यंत घेऊन जाण्याची धमक या वैशिष्ट्यांमुळे आज शिवसेना नेतेपदापर्यंत त्यांची वाटचाल झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT