Prabhakar Deshmukh, Shambhuraj Desai Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara News : प्रभाकर देशमुखांना वाद टाळायचाय… पण शंभूराज देसाई आता काय करणार?

Amol Sutar

-रुपेश कदम

Satara News : जिहे - कठापूरच्या पाण्याबाबत सातारा जिल्ह्यात पूर्व आणि पश्चिम असा वाद निर्माण झाला आहे, तो पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी समन्वयाने मिटवावा,अशी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांची अपेक्षा आहे. त्यावर पालकमंत्री शंभूराज देसाई आता काय करणार ? याकडे लक्ष लागले आहे. आम्हाला आमच्या हक्काचे जिहे - कठापूर, उरमोडी, टेंभू व तारळीचे पाणी मिळालेच पाहिजे, अशी स्पष्ट मागणी देशमुख यांनी केली. (Satara News)

प्रभाकर देशमुख म्हणाले, सातारा जिल्ह्यात दुष्काळाची सर्वात भीषण परिस्थिती इतरत्र नसून माण - खटाव तालुक्यात आहे. त्यामुळे आम्ही आमच्या हक्काचं पाणी मागतोय, जे इतके दिवस तुम्ही वापरलंय. आम्हाला 2009 पूर्वी 12.62 टीएमसी पाणी आरक्षित झालेले आहे. यापैकी गेल्या 15 वर्षांत केवळ 4 टीएमसी पाणी आमच्या निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे प्रत्यक्ष वापरले जात आहे.

म्हणजे फक्त 30 टक्के पाणी आम्ही वापरत आहोत. आमचं उर्वरित पाणी आम्हाला आज जे विरोध करतायत त्यांनी आजपर्यंत वापरलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत अडवणुकीची भूमिका घेणे योग्य नाही, आम्ही ती सहन करणार नाही. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यात पुढाकार करून समन्वय करावा, पूर्व विरुद्ध पश्चिम असा अनाठायी वाद मिटवावा.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देशमुख म्हणाले, दुष्काळी परिस्थितीत सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचं काहीही कारण नाही. पश्चिम भागातील लोकांनी आम्हाला आमच्या हक्काचं पाणी दिलं पाहिजे. आमच्या हक्काचं आरक्षित केलेले पाणी आम्हाला मिळाले पाहिजे. पाण्यावाचून आमची माणसं स्थलांतरित होत आहेत, देशोधडीला लागली आहेत. तुम्ही म्हणताय चार महिन्यांचं पाणी तर तुम्हाला आठ महिने अन् आम्हाला चार महिने हा कुठला न्याय आहे?

2009 पूर्वी 12.62 टीएमसी आणि त्यानंतर 5 टीएमसी असे एकूण साडेसतरा टीएमसी पाणी आमच्यासाठी आरक्षित झाले आहे. दुर्दैवाने यातील केवळ चार टीएमसी पाणी आमच्या निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे वापरू शकलो आहे. आमचे हे शिल्लक पाणी जे विरोध करीत आहेत त्यांनी इतके दिवस वापरले आहे. अत्यंत दुष्काळी परिस्थितीत आता जे पाणी आम्हाला मिळतंय ते आमच्या हक्काचंच आहे.

त्यामुळे अडवाअडवी करताना आमचा मागचा हिशोब आम्हाला द्या. तुम्ही जर लढा उभारला तर आम्हीसुद्धा आंदोलन करण्यास सक्षम आहोत. वर्षानुवर्षे आम्ही अन्याय सहन केला आहे, पण आता सहन करणार नाही. आमच्या हक्काचे पाणी मिळण्यासाठी आम्ही तीव्र संघर्ष करू, असा इशारा यावेळी देशमुख यांनी दिला आहे.

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT