Sangli, 27 February : नियोजित शक्तीपीठ महामार्गात तब्बल 60 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होणार आहे. तसेच, नदीकाठी या महामार्गाच्या भरावामुळे पाणी तुंबून त्याचा फटका कराड, पाटणपर्यंत बसणार आहे. सर्वांत महत्वाचे म्हणजे आगामी 2029 च्या निवडणुकीत पैसा उपलब्ध व्हावा आणि त्यातून निवडणुका जिंकता याव्यात, यासाठी शक्तीपीठ महामार्ग केला जात आहे, असा खळबळजनक आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे.
सांगली (Sangli) जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शविण्यासाठी शेतकरी आणि ग्रामस्थांच्या वतीने सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेला आलेल्या शेट्टी यांनी माध्यमांशी बोलताना हा मोठा गौप्यस्फोट सत्ताधाऱ्यांवर केला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) म्हणाले, शक्तीपीठ महामार्गाचा सुधारित भाग भागा वाळवा, शिराळा आणि पन्हाळा तालुक्यांतून आजऱ्याच्या दिशेने जातो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केले आहे. वास्तविक पाहता गरज नसलेला हा महामार्ग वाळवा तालुक्यात आणण्याची काही एक गरज आहे.
शक्तीपीठ महामार्ग ज्या ठिकाणी नद्या ओलांडतो, त्या ठिकाणी पुलाच्या दोन्ही बाजूला डोंगरासारखा भराव पडणार आहे, त्या महामार्गाच्या भरावामुळे वाळवा आणि शिराळा तालुक्यांतील शेती नष्ट होणार आहे. पण, नदीकाठच्या गावांनासुद्धा स्थलांतरित व्हावं लागणार आहे. दोन दोन महिने पाणी तुंबून राहण्याची शक्यता निर्माण होणार आहे. एवढंच काय तर कराड शहर अगदी पाटणपर्यंत कोयना आणि कृष्णा नदीचे पाणी तुंबत जाणार आहे. पाटण आणि कराड भागाला पुराचा फटका बसणार आहे, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, ऐतवाडे गावाजवळ जिथं वारणा नदी ओलांडली जाते, त्या ठिकाणाहून पश्चिमकडे शाहूवाडीच्या मलकापूरपर्यंत पाणी तुंबत जाणार आहे. शाहूवाडी, पन्हाळा आणि शिराळा तालुक्यातील गावांना त्याचा फटका बसणार आहे. शक्तीपीठ महामार्गाची नवीन अलाईमेंट सरकार सांगली, कोल्हापूरवर लादू पाहत आहे, त्याची गरज नाही.
सहापदरी असलेल्या शक्तीपीठ महामार्गाचा एका किलोमीटरचा खर्च हा १२४ कोटी रुपये आहे. पण सध्या सुरू असलेल्या नाशिक ते अक्कलकोट या सहापदरी रस्त्याच्या एका किलोमीटरचा खर्च हा ५१ कोटी रुपये आहे. म्हणजे एक रस्ता केंद्र सरकार करतंय आणि एक रस्ता राज्य सरकार करतंय. केंद्राच्या रस्त्याच्या एका किलोमीटरचा खर्च हा ५१ कोटी, तर राज्य सरकारचा एका किलोमीटरचा खर्च हा १२४ कोटी रुपये आहे. म्हणजेच सुमारे ४० हजार कोटी रुपयांमध्ये होणारा रस्ता एक लाख ५ हजार कोटी रुपयांमध्ये व्हायला लागला आहे, त्यामुळे शक्तीपीठ महामार्गामध्ये ६० ते ६५ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होणार आहे, असा आरोप शेट्टी यांनी केला.
आगामी २०२९ च्या निवडणुकीत पैसा उपलब्ध करण्यासाठी, निवडणुका जिंकण्यासाठी वाळवा, शिराळा, पलूस, शाहूवाडी आणि पन्हाळा या तालुक्यातील शेतकऱ्यांचा बळी देऊन हा शक्तीपीठ महामार्ग होणार असेल तर आम्ही ते सहन करणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.