Sangli News : राज्यात शक्तिपीठा महामार्गावरून सध्या शेतकरी रस्त्यावर उतरले असून कोल्हापुरपासून यवतमाळपर्यंत महामार्गाला विरोध होत आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महायुतीचे सरकार फक्त भाजपचे देणगीदार, कॉर्पोरेट भागीदार व ठेकेदारांच्या हितासाठी ‘शक्तिपीठ’सारखे महामार्ग प्रकल्प रेटत असल्याचा दावा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष राज्य सचिव मंडळ सदस्य डॉ. अजित नवले यांनी केला आहे. तसेच नवले यांनी, शक्तिपीठ महामार्ग शेती व शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठीच सरकार रेटू पाहत असल्याचा देखील आपोर केला आहे. ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या 15 व्या सांगली जिल्हा अधिवेशनात बोलत होते. यावेळी मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवनात झालेल्या अधिवेशनास पक्षाचे किसन गुजर आणि सुनील मालुसरे उपस्थित होते.
देश, राज्यात सत्तेवर असलेल्या शक्ती देशातील लोकशाही, संविधान व धर्मनिरपेक्षता, एकजूट नष्ट करू पाहत आहेत. कॉर्पोरेट शोषणाविरोधात संघटित होऊ पाहणाऱ्या शेतकरी, कामगार, शेतमजूर, श्रमिक जनतेत फूट पाडण्यासाठी व धर्मांध, मनुवादी अजेंडा पुढे रेटण्यासाठी धर्म व जातीचा गैरवापर केला जात असल्याचा दावा नवले यांनी केला आहे.
राज्यासह देशातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन, दूध, कापूस, शेतीमालाचे भाव सरकारच्या हस्तक्षेपाने पाडले जात आहेत. कामगार व योजना कर्मचाऱ्यांना कामाचा मोबदला नाकारला जात असल्याचा हल्लाबोल देखील नवले यांनी केला आहे.
यावेळी सुनील मालुसरे यांनी, माकप जिल्हा अधिवेशनानिमित्त सरकारच्या धोरणांविरोधात संघर्षाची जोरदार तयारी करत आहे. जनतेने संघर्षात सामील व्हावे, असे आवाहन केले आहे. तर शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे, महिला अत्याचाराविरोधात सरकारने कडक पावले उचलावीत, असे ठराव या अधिवेशनात मांडण्यात आले.
दरम्यान असेच अधिवेशन कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे पार पडले. यावेळी माकपच्या जिल्हा अधिवेशनात राज्य निरीक्षक उदय नारकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत यावेळी भरमा कांबळे, सुभाष जाधव, ए. बी. पाटील आदी उपस्थित होते. येथील समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात झालेल्या झालेल्या अधिवेशनात शक्तिपीठ महामार्ग रद्द करा यासह विविध पाच ठराव करण्यात आले.
एकीकेड शक्तिपीठ महामार्गास जिल्ह्यात मोठा विरोध होत आहे. अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या आमदारांना गरज पडल्यास लढा देण्यास तयार असल्याचा इशाला सरकारला दिला आहे. अशातच आता भाजप युवा मोर्चाने सांगलीतील खरसुंडी देवस्थानचा समावेश करण्यात यावा शक्तीपीठ महामार्गामध्ये करावी अशी मागणी केली आहे. याबाबत भाजप युवा मोर्चाचे प्रमुख तथा खानापूर-आटपाडी विधानसभा निवडणूकप्रमुख प्रणव गुरव यांनी मागणी केली आहे.
खरसुंडी देवस्थान हे दुष्काळी माणदेशातील महत्त्वाचे देवस्थान आहे. दररोज येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. वर्षातून दोन मोठ्या यात्रा होत असतात. यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटकातून लाखो भाविक येतात. महत्त्वाचे म्हणजे खिलार जनावरी खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होऊन कोट्यवधींची उलाढाल होते. त्यांच्या सोयीसाठी व महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानापैकी एक असणाऱ्या खरसुंडी देवस्थान शक्तिपीठ महामार्गाला जोडावे, असी भाविकांची इच्छा असल्याचे गुरव यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.