
Shakitpith Mahamarg : कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि यवतमाळ मधील काही शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाची प्रक्रिया लवकर सुरू करा अशी मागणी लावून धरली आहे. या शेतकऱ्यांनी आप आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना याबाबचे निवेदन देत ही मागणी केली आहे. तर याच्या उलट कोल्हापूर, सांगलीसह 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला कडवा विरोध दर्शवला आहे. यामुळे महामार्गातील बाधीत शेतकऱ्यांमध्ये मतभेद असल्याचे आता समोर येत आहे.
दरम्यान शनिवारी कोल्हापूरसह सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणे आंदोलन करण्यात आले आहे. कोल्हापुरमधील शिरोळ, हातकणंगले, करवीर, कागल, भुदरगड, आजरा या सहा तालुक्यांतील शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी एकवटले होते.
कोल्हापूरमध्ये शक्तिपीठ महामार्गावरून जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. यात काही एजंट सक्रिय असून ते शेतकरी जमिनी देण्यासाठी तयार असल्याचे सांगत आहे. यामुळे हा महामार्ग कोल्हापुरातून कसा जाणार, याचे नोटिफिकेशन काढा अशी मागणी शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीने केली. तर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे वादग्रस्त महामार्ग रद्दच करावा, जे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरवत आहेत त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती.
पालकमंत्री आबिटकर हा महामार्ग रद्द केला असून, इतर चर्चा निरर्थक आहेत, त्याकडे दुर्लक्ष करावे’, असे म्हणत कोल्हापूरमधून जाणाऱ्या महामार्गाचा प्रश्नच निकाली काढला. तसेच त्यांनी, हा महामार्ग रद्द केला आहे. त्यामुळे चुकीचा प्रचार करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा. तसे निवेदनही मुख्यमंत्र्यांना पाठवून त्याचा पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तेली यांनी दिली आहे.
कोल्हापूरपाठोपाठ सांगलीतही या महामार्गाला विरोध वाढला असून तो रद्दच झाला पाहिजे, या मागणीसाठी सांगली शेतकरी बचाव कृती समितीतर्फे करण्यात आली आहे. तर कोणताहीमधला मार्गी काढून, संभ्रम निर्माण करून शक्तिपीठ द्रुगगती महामार्ग करण्याचा राज्य सरकारने प्रयत्न करू नये, असाही इशारा देण्यात आला आहे. तसेच जर सरकारने महामार्ग रेटलाच तर आम्ही आंदोलनात सहभागी होऊ असे संकेत खासदार विशाल पाटील व आमदार रोहित पाटील यांनीही दिले आहेत.
शक्तिपीठ महामार्ग हा जसा कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी बाधित आहे. तसाच तो हिंगोली जिल्ह्यातील वसमत व कळमनुरी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक आहे. यामुळे वसमत, कळमनुरी तालुक्यातील शेतकर्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले.
तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी या महामार्गाला स्थगिती दिली. मात्र आता फडणवीस सरकार पुन्हा शेतकऱ्यांच्या बागायती बळकावून घेत आहे. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकार्यांना भूसंपादन करण्याच्या सूचना केल्या जात असल्याचेही आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तर कोणत्याही परिस्थितीत महामार्गाचे काम होऊ दिले जाणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.