Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar : शरद पवारांनी सांगितला, वसंतदादा-राजारामबापू यांच्यातला विकासाचा संघर्ष

सरकारनामा ब्यूरो

अनिल कदम

Sangli News : वसंतदादा पाटील व राजारामबापू पाटील यांच्यात संघर्ष होता, पण तो विकासासाठी होता. ते सामंजस्यपणाने वाद मिटवत होते. माणसे जोडण्याचा बापुंचा स्वभाव होता. दादांनी सत्ता असताना विकास केला, पण विरोधात असताना राजारामबापू पाटील यांनी विकासाचे काम केले. त्यामुळे राज्याच्या विकासात वसंतदादांबरोबर राजारामबापूंचे योगदान मोठे असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी काढले.

सांगलीत महापालिकेच्यावतीने स्टेशन चौकात उभारण्यात आलेल्या राजारामबापू पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण खा. शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, माजी मंत्री विश्वजीत कदम, आमदार मानसिंगराव नाईक, अनिल बाबर, विक्रमसिंह सावंत, सुमन पाटील, अरूण लाड, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील आदी उपस्थित होते.

वसंतदादा व राजारामबापू यांच्यातील वादावर शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, दोघांमधील मतभेद कधी विकासाच्या आड आणले नाही. विकासकामे करताना दोघेही सामंजस्याने निर्णय घेत असत. दादा व बांपू यांच्या एक मोठा फरक होता. तो म्हणजे दादा सत्तेत राहून राज्याच्या विकासाचे, कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम करायचे ते व्यवहारिक होते. तर बापू बराच काळ विरोधात गेला. पण तरीही त्यांचा माणसं जोडण्याचा स्वभाव, कार्यकर्ते जपण्याची कला या स्वभामुळे त्यांनी महाराष्ट्रात विकासात त्यांनी मोठी भूमिका आहे. त्यांनी दूरदृष्टी ठेवून साखर कारखानदारी व अन्य संस्था उभारल्या.

पवार म्हणाले, दुष्काळाचा सामाना करताना देशातील सर्कसीचे खेळ करून स्वाभीमानाने जगण्याची भूमिका येथील लोकांनी घेतली. त्यांनी जगण्यासाठी कधीही लाचारी पत्करली नाही. विरोधी पक्षात असताना शेतीमालाला भाव मिळावा यासाठी जळगाव ते लातूर दिंडी काढली. यात अनेकजण गळाले पण राजारामबापू व प्रा. एन. डी. पाटील यांनी एक तासही विश्रांती न घेता दिंडी पायी चालून पूर्ण केली. कष्टकरी, सामान्य माणसाला एक विचार देण्याची भूमीका त्यांची आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जयंत पाटील काम करत आहेत. त्यांना साथ द्यावी, असेही पवारांनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माणसं जोडण्याची कला...

राजारामबापू पाटील प्रदेश काँग्रसचे अध्यक्ष झाले, त्यावेळी मी पुणे जिल्ह्यात युवक काँग्रेसचा पदाधिकारी होती. तेव्हा बापुंना जवळून अनुभवता आले. पुण्यातील काँग्रेस कमिटी बाहेरील कट्यावर बसून बापुंचे विचार ऐकत होतो. माणसं जोडण्याची कला त्यांना चांगली अवगत होती. प्रदेश कॉग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी संपूर्ण राज्यात कार्यकर्ते निर्माण करण्याचे काम केले. यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात उद्योगमंत्री म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या संकल्पनेतून राज्यात नवीन उद्योग तयार झाले. अनेक ठिकाणी एमआयडीसीची निर्मिती केली. उद्योग व उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी केले असेही पवार यांनी सांगितले.

माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले, संघर्षातही माणसे कशी जोडायची याचे शिक्षण राजारामबापू पाटील यांच्याकडून मिळते. दादा-बापू यांच्यात वाद होत असे, पण त्यावेळी एकविचाराने बसून वाद मिटवले जात होते. राज्यात असे क्वचितच लोक आहेत. त्यांच्याकडे माणसे जोडण्याची कला आहे. त्यामुळे राजारामबापू पाटील यांचे स्मरण आजही होते. जिल्ह्यात अनेक माणसे त्यांनी जोडली. पण आता राजकारण विचाराचे राहिले नाही. वचपा काढण्याचे राजकारण सुरु आहे. राजारामाबापू पाटील यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. सर्वांनी सहकार्य केले. हा आमच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय होता.

भाजपने नेते अनुपस्थित

राजारामबापू पाटील पूर्णाकृती पुतळा अनावरणच्या कार्यक्रमाला महापालिकेने भाजपच्या नेत्यांना निमंत्रण दिले होते. मात्र पालकंमत्री सुरेश खाडे कार्यक्रमानिमित्त बाहेर होते. तर खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर यांची गैरहजेरी होती. तर महायुतीतील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT