Baliram Sathe Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar Politic's : जयंतराव जाऊन शशिकांत शिंदे आले; पण बळीराम साठेंना पवारांनी दिलेला शब्द पूर्ण होईना...

Solapur Former NCP SP District President Baliram Sathe : शरद पवार यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे बळीराम साठे यांना जिल्हाध्यक्षपद मिळणार का, याची उत्सुकता त्यांच्या समर्थकांना आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आल्याने साठे समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे

Vijaykumar Dudhale

Solapur, 04 August : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी वसंतराव देशमुख यांच्या नियुक्तीनंतर माजी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी बंडाचा झेंडा उभारला होता. मात्र, ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या भेटीनंतर साठेंनी आपल्या बंडाची तलवार म्यान केली होती. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा देऊन त्या ठिकाणी शशिकांत शिंदेंची वर्णी लागली आहे. पण, साठे यांना देण्यात आलेला जिल्हाध्यक्षपदाचा दिलेला शब्द अजूनही पूर्ण झालेला नाही, त्यामुळे साठे यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साठे यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात (NCP SP) मोठी खळबळ उडाली होती. त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून प्रवेशाची ऑफर आली होती. पण पवारांनी शब्द दिल्याने त्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते.

जिल्हाध्यक्षपदावरून हटविण्यात आल्यानंतर बळीराम साठे (Baliram Sathe) यांनी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर आरोप केले होते. या दोघांनी षडयंत्र करून आपल्याला जिल्हाध्यक्षपदावरून दूर केले. मोहोळ मतदारसंघातील पक्षाचा बदलेला एबी फार्म मोहिते पाटील यांच्या जीवाला लागला होता, त्यामुळेच त्यांनी आपल्याविरोधात षडयंत्र केले, असा आरोप साठेंनी केला होता.

बारामतीत शरद पवार यांच्या भेटीत त्यांना सोलापूरच्या पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत बळीराम साठे यांची भूमिका पूर्वीप्रमाणेच राहील, असे सांगून सोलापूरसाठी दोन जिल्हाध्यक्ष नेमण्याबाबत सूतोवाच केले होते. त्यानंतर साठे यांनी आपली बंडाची भूमिका बदलत पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर साठे यांचे एक शिष्टमंडळ पवारांना भेटून आले आहे.

दरम्यान, दोन जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीला पक्षातील एका बड्या नेत्याचा विरोध होता, अशी चर्चा त्या वेळी होती. पण मधल्या काळात तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी साताऱ्याचे शशिकांत शिंदे यांची निवड करण्यात आली. नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नियुक्तीनंतर बळीराम साठे यांची नियुक्ती जाहीर होईल, अशी साठे समर्थकांना अपेक्षा हेाती. पण, शिंदेंची नियुक्ती होऊन पंधरा दिवस झाले तरी अद्याप साठे यांच्या नियुक्तीबाबत निर्णय होऊ शकलेला नाही.

ज्येष्ठ नेते शरद पवार हे सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत, त्या दौऱ्यात बळीराम साठे यांच्या जिल्हाध्यक्षपदाबाबत निर्णय होईल, असे पवारांनी भेटायला गेलेल्या साठे समर्थकांना सांगितले होते. त्यानुसार शरद पवार हे ऑगस्टच्या मध्यावर सोलापूरच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. त्यानंतर साठेंबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT