Kolhapur News, 18 Mar : विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी महायुतीकडून (Mahayuti) पाच उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपकडून तीन राष्ट्रवादीकडून एक तर शिवसेनेकडून एक उमेदवार निश्चित करण्यात आला आहे. कोल्हापुरातून शिवसेनेकडून माजी खासदार संजय मंडलिक किंवा शिवसेनेचे नेते माजी नगरसेवक सत्यजित कदम त्यांना संधी मिळेल अशी आशा होती.
मात्र, त्यांच्या शिवसेनेकडून (Shivsena) विधानपरिषदेसाठी नंदुरबारचे चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव निश्चित करण्यात आल्याने कदम आणि मंडलिक यांच्या आशेवर पाणी फिरलं आहे. या दोघांनाही अद्याप शिवसेनेकडून वेटिंगवर ठेवण्यात आलं आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मंडलिक किंवा कदम यांना विधान परिषद मिळेल अशी चर्चा केली होती. मात्र, या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर माजी खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांसाठी विशेष मेहनत घेतली. विधानसभा निवडणुकीतील यशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वारंवार माजी खासदार संजय मंडलिक यांना मुख्य राजकीय प्रवाहात ठेवण्याचं काम केले. सातत्याने मंडलिक यांच्या मुंबई फेऱ्या वाढल्याने त्यांना येत्या विधान परिषद निवडणुकीचे संधी मिळेल अशी चर्चा जोरात सुरू होती.
कोल्हापूर (Kolhapur) लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या सर्वच जागा जिंकून आल्याने शिवाय माजी खासदार मंडलिक यांनीही जोडण्या लावल्याने त्यांना विधानपरिषद मिळेल अशी दाट शक्यता होती. मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांवर नंदुरबारचे चंद्रकांत रघुवंशी यांना संधी दिल्याने मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांची निराशा झाली आहे.
विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेत प्रवेश केलेले सत्यजित उर्फ नाना कदम यांची उमेदवारी निश्चित समजली जात होती. मात्र कदम यांना होणारा भाजपमधील पक्षांतर्गत विरोध, आणि काँग्रेस उमेदवारांबाबत झालेली खेळी यातूनच कदम यांनी माघार घेत राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची उमेदवारी निश्चित झाली. मात्र त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी कदम यांनी आपल्या खांद्यावर घेतली.
त्यामध्ये त्यांना यश देखील आले. तत्पूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्य नियोजन मंडळाच्या अध्यक्षपदाचे आश्वासन सत्यजित उर्फ नाना कदम यांना देण्यात आले होते. मात्र कदम यांनी विधान परिषदेची मागणी केली होती. या विधान परिषदेत त्यांना संधी मिळेल अशी आशा होती. आता संधी न मिळाल्याने राज्य नियोजन मंडळावर कदम यांची वर्णी लागणार का हेच पहावे लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीत शब्द दिल्याप्रमाणे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्षपद सत्यजित उर्फ कदम यांना मिळेल अशी दाट शक्यता आहे. कारण मित्रा संस्थेच्या उपाध्यक्ष पदावर आमदार राजेश क्षीरसागर यांची वर्णी लागलेली आहे. एकाच सदस्याची दोन महामंडळावर नियुक्ती होत नसल्याने कोणत्याही क्षणी क्षीरसागर यांच्याकडून राज्य नियोजन मंडळाच्या पदावरचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदम यांची वाट बऱ्यापैकी सोपी झाली आहे. मात्र त्यांना या ठिकाणी संधी दिली जाणार का? हे पाहावं लागणार आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.