Eknath Shinde, Devendra Fadnavis , Ajit Pawar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maharashtra Political Crisis : ''...तर महाराष्ट्रात आणखी एक मोठा राजकीय भूकंप होईल! ''; काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी उफाळून आल्यानंतर शरद पवार व अजित पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. यात अजित पवार गटाकडून ४० हून अधिक आमदार तर शरद पवार गटाला १३ हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर काही आमदार अद्याप कुठल्या गटाला समर्थन द्यावं या संभ्रमात आहेत. याचवेळी माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी खळबळजनक दावा केला आहे.

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण(Prithviraj Chavan) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीतील उभ्या फुटीवर भाष्य केलं आहे. चव्हाण म्हणाले, अजित पवार गटाकडे पक्षांतर कायद्यानुसार दोन-तृतीयांशासाठी आवश्यक असणारे ३६ आमदार नाहीत. त्यामुळे अजित पवारांसह सर्व मंत्री निलंबित होतील असं मोठं विधान चव्हाण यांनी केलं आहे.

चव्हाण काय म्हणाले...?

राष्ट्रवादी काँग्रेस(NCP)च्या फुटीर गटाकडे ३६ आमदार नाहीत. अजूनपर्यंत त्यांच्याकडे ३६ आमदार दिसले नाहीत. त्यांच्याकडे ३६ आमदार असते तर त्यांनी प्रदर्शन केलं असतं. त्यांचा फोटा काढला असता. त्यामुळे त्यांच्याकडे दोन-तृतीयांश आमदार नसतील, तर महाराष्ट्रात आणखी एक मोठा राजकीय भूकंप होईल. ज्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे, ते सर्व आमदार निलंबित होतील असं खळबळजनक विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.

'' हा केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रश्न नाही, तर...''

चव्हाण म्हणाले, सदस्यत्व रद्द झाल्यानंतर संबंधित आमदारांना विद्यमान विधीमंडळात मंत्री होता येणार नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. याचा निर्णय हो किंवा नाही असं झाला पाहिजे. हे आमदार निलंबित होणार नसतील तर त्यांच्याकडील ३६ आमदारांचा आकडा त्यांनी दाखवावा. 36 पेक्षा जास्त आमदार दुसऱ्या गटात आहेत हे सिद्ध झाल्यास त्यांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे लागेल. तसे झाले तरच त्यांचे निलंबन रद्द होईल असे कायदा सांगतो. पण हा केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रश्न नाही, हा संपूर्ण राज्याचा प्रश्न आहे असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

''...हा संपूर्ण पक्षपातीपणा! ''

आता काही आमदार अटी टाकून त्यांच्याकडे येत आहेत. आधी खोक्याची भाषा वापरली आता मंत्रीपदाची भाषा आहे. राज्याच्या प्रश्नाकडे कोणाचेच लक्ष नाही. या सगळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. सत्तेत राहण्यासाठी भ्रष्टाचार करणाऱ्यांना आता साथ देत आहेत. पक्षाच्या अध्यक्षांनी नऊ मंत्री यांचे निलंबन केले आहे मग विधानसभा अध्यक्ष कशाची वाट पाहत आहेत. हा संपूर्ण पक्षपातीपणा आहे. विधानसभा अध्यक्षाना शिवसेना (Shivsena) निलंबनाबाबत दहा ऑगस्टपर्यंत निकाल द्यावा लागणार आहे असंही चव्हाण यावेळी म्हणाले. राज्यात वैध सरकार आहे की अवैध सरकार आहे हे यावरून ठरणार आहे असंही यावेळी त्यांनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT