Solapur, 15 September : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्ह्यातील ठरावाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राजकीय पक्षांकडून समीकरणांची जुळवाजुळव सुरू आहे. सोलापुरात झालेल्या बैठकीत आमदार राजेंद्र राऊत आणि माजी आमदार संजय शिंदे यांच्यात खडाजंगी झाल्याची चर्चा आहे, त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
आम्ही कर्जच घेतले नाही, त्यामुळे कर्जवसुलीची जबाबदारी आमच्यावर का? ज्यांनी कर्ज घेतले आहे, त्यांच्याकडून ते वसूल करा आणि आमचा निवडणुकीला उभा राहण्याचा मार्ग मोकळा करा, हे पालकमंत्र्यांना सांगा, अशी मागणी माजी संचालकांनी बैठकीत केली, त्यामुळे वातावरण एकदम गंभीर झाले होते, असे सांगण्यात येत आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि राजेंद्र राऊत यांनी जिल्ह्यातील आमदार, माजी आमदार आणि इतर नेतेमंडळींची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत कलम ८८ च्या वसुलीवरून गरमागरम चर्चा झाल्याचे कळते.
बार्शी तालुक्यातील बेकायदेशीर कर्जवाटप, थकलेले कर्ज आणि कलम ८८ अन्वये बॅंकेच्या नुकसानीच्या भरपाईसाठी माजी संचालकांना आणि त्यांच्या वारसांना वसुलीच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्या रक्कम निश्चितीवरून माजी संचालकांना जोरदार बॅटिंग केली. त्याच ठिकाणी वादाची ठिणगी पडली.
यात प्रामुख्याने माजी आमदार संजय शिंदे, जयवंतराव जगताप, बबनराव आवताडे आणि सुरेश हसापुरे यांनी ८८ अन्वये वसुलीचा मुद्दा उपस्थित केला. आम्ही डीसीसी बॅंकेतून कर्जच घेतले नाही, तर आम्हाला ८८ च्या चौकशीत कशाला अडकवता? ज्यांनी कर्ज घेतले आहे, त्यांच्याकडून कर्ज भरून घ्या? आमच्यावर वसुलीची जबाबदारी का? असे प्रश्न उपस्थित केले, त्यामुळे बैठकीचा माहौलच बदलून गेला.
ज्याने कर्ज घेतले आहे, त्याच्याकडून ते वसूल करा आणि आम्हाला ८८ च्या जबाबदारीतून मोकळे करण्यास पालकमंत्री जयकुमार गोरेंना सांगा, आणि आम्हाला निवडणूक लढविण्यासाठी मोकळे करा, असा मुद्दा संजय शिंदे यांनी मांडला. त्यामुळे बैठकीत जोरदार खडाजंगी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या बैठकीत सहकारी सोसायटी गटातील 11 जागा त्या त्या तालुक्यातील नेत्याला देण्याचा निर्णय झाला आहे. उर्वरीत सहा जागांचे वाटप माघारीच्या आदल्या दिवशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावर मुख्यमंत्री आणि पालकमंत्री गोर यांच्याकडून शिक्कामोर्तब करून घेण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, तत्पूर्वी झालेल्या खडाजंगीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.