Anna Hazare
Anna Hazare  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांकडून अण्णा हजारेंच्या मनधरणीचा प्रयत्न

मार्तंड बुचुडे

पारनेर ( जि. अहमदनगर ) - राज्य सरकारच्या वाइनविक्रीच्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Anna Hazare ) यांनी सोमवारपासून ( ता. 14 ) बेमुदत उपोषणाचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. त्या आशयाचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) व उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांना पाठविले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादनशुल्क विभागाचे सहआयुक्त यतीन सावंत व उपआयुक्त सुनील चव्हाण यांनी हजारे यांची काल ( शुक्रवारी ) भेट घेतली. ( State Excise officials try to persuade Anna Hazare )

त्या वेळी उभयतांनी हजारे यांना, ‘उपोषण करू नये, तुमचे काय म्हणणे आहे ते सांगा. या कायद्यात काही दुरुस्त्या हव्या असतील तर त्याही सांगा. आम्ही तसा बदल करू शकतो. मात्र, आपण उपोषण करू नये,’ अशी विनंती केली.

राज्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार वाढला आहे. लोकायुक्तासारखा कायदा होत नाही. शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही. गावे आदर्श करण्याऐवजी सरकार वाइन घरोघरी पोचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. आता आणखी वाईट पाहण्याची इच्छा नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.

अण्णा हजारे पुढे म्हणाले की, राज्य सरकार नको त्या गोष्टींकडे लक्ष देत आहे. दारूविक्रीतून महसूल वाढावा म्हणून दारूच्या किमती कमी केल्यात. माझे जीवन मी देशसेवा व समाजसेवेसाठी अर्पण केलेय. जगायचे ते समाजासाठीच. त्यामुळे उपोषणावर मी ठाम आहे, असे सांगितले.

राज्यात अवघे सहाशे-सातशे परवाने

यावेळी सावंत म्हणाले, की हा निर्णय शेतकरीहिताचा आहे. वाइन द्राक्षे, स्ट्रॉबेरी व जांभूळ यांसारख्या शेतीमालापासून तयार केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला अधिक बाजारभाव मिळेल. शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होईल. वाइनची विक्री सर्रास दुकानांतून केली जाणार नाही. राज्यात फक्त सहाशे ते सातशे दुकानांनाच परवाना दिला जाणार आहे. परवाने देताना शाळा, मंदिर यांपासून दूर असणाऱ्या मोठ्या व नोंदणीकृत दुकानांना व दहापेक्षा अधिक नोकर कामाला असतील त्याच ठिकाणी देण्यात येणार आहे. यात अल्कोहोलचे प्रमाणही कमी आहे. तुम्ही या निर्णयात काही दुरुस्ती सुचवा, तशी दुरुस्तीही करू, अशी विनंती सावंत यांनी हजारे यांना केली.

ऊस उत्पादकांना किती फायदा झाला?

हजारे म्हणाले, की उसापासून दारू बनते. त्यात किती शेतक-यांचा फायदा होऊन ते सुधारले, असा प्रश्न उपस्थित केला. माझा तुमच्यावर रोष नाही. माझी मागणी मान्य केली तर ठीक, नाही तर या मागणीसाठी माझे आयुष्य संपले तरी हरकत नाही, असा निर्वाणीचा इशाराही हजारे यांनी दिला. या वेळी सरपंच लाभेश औटी, सुरेश पठारे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT