Raju Shetti
Raju Shetti  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pandharpur News : उसाच्या काटामारीतून साखर कारखानदार दरवर्षी ४५०० कोटींचा दरोडा घालतात : राजू शेट्टींचा आरोप

भारत नागणे

पंढरपूर : एकरक्कमी एफआरपीची (FRP) लढाई जिंकली असली तरी काटामारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरु आहे. यापुढची लढाई काटामारीच्या विरोधात असेल असे जाहीर करत, राज्यातील साखर कारखानदारांकडून काटामारीतून दरवर्षी ऊस उत्पादकांच्या घरावर साडेचार हजार कोटींचा दरोडा टाकला जातो, असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आज पंढरपुरात केला. (Sugar mill operators rob Rs 4500 crore every year by stealing sugarcane weight : Raju Shetti alleges)

पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महादेव रोकडे यांनी ऊस वजन काटा उभारला आहे. राजू शेट्टी यांच्या हस्ते शनिवारी (ता. १४ जानेवारी) सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानीच्या या पहिल्या वजन काट्याचे लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी पत्रकारांशी‌ बोलताना शेट्टी यांनी साखर कारखानदारांचा चांगलाच समाचार घेतला.

शेट्टी म्हणाले की, राज्यात दरवर्षी १३ कोटी ३१ लाख टन उसाचे गाळप होते. यामध्ये सहकारी व खासगी साखर कारखानदार मिळून दरवर्षी एक कोटी २० लाख टन उसाची चोरी करतात. त्यातून सुमारे साडेचार हजार कोटी रुपयांची साखर चोरी करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर दरोडा टाकला जातो. हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. तरीही शेतकरी लुटणाऱ्या साखर कारखानदारांचेच उदो उदो करतात.

यावर्षी राज्यात १९६ साखर कारखाने सुरू आहेत. दरवर्षी सुमारे एक कोटी टन उसाची चोरी होते. त्यातून सुमारे साडेचार हजार कोटीच्या साखरेवर डल्ला मारला जातो. काटामारीला चाप लावण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ‌प्रत्येक जिल्ह्यात वजन काटे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात पंढरपुरातून झाली आहे. वजन काट्यावर नाममात्र किमतीमध्ये शेतकऱ्यांना वजन करुन दिले जाणार आहे, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.

पुढील वर्षापासून प्रत्येक कारखान्यांनी इलेक्ट्रॉनिक्स वजन काटे बसवावेत, असे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. एकरक्कमी एफआरपी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली होती. मात्र, त्याचे आदेश अद्याप न निघाल्याने कारखाने एकरक्कमी एफआरपी देण्यास टाळाटाळ करत आहेत. कारखानदारांच्या मानगुंटीवर बसून एफआरपीची रक्कम घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही या वेळी दिला.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाही. स्वबळावर किंवा स्थानिक आघाड्यांंबरोबर युती करून निवडणुका लढणार असल्याचे या वेळी शेट्टी यांनी स्पष्ट केले. या वेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, माजी अध्यक्ष समाधान फाटे, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, युवा संघटनेचे प्रदेश प्रवक्ते रणजित बागल, सचिन आटकळे, शहाजन शेख आदींसह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT