Dr. Sujay Vikhe Patil
Dr. Sujay Vikhe Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सुजय विखे पाटील म्हणाले, ऊस लागवडीबाबतचे निर्बंध उठविल्याने शेतकऱ्यांसमोर संकट

सूर्यकांत नेटके

अहमदनगर - अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी त्यांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या कामाचा लेखा-जोखा मांडण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील शिल्लक उसाबाबत प्रश्न विचारला असता डॉ. सुजय विखे पाटील यांनी राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न कसा निर्माण झाला हे सांगताना त्यावर उपायही सुचविला. ( Sujay Vikhe Patil said that lifting restrictions on sugarcane cultivation is a crisis for farmers )

डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यात ठरावीक भागात ऊस शिल्लक आहे. काही भागात ऊस शिल्लक राहण्याची भीती असल्याची वस्तुस्थिती आहे. मात्र उसाची एवढी लागवड होईल याचा कोणालाही अंदाज आला नाही. त्यामुळे शिल्लक उसाबाबत साखर कारखान्यांना दोष देण्यात अर्थ नाही. नोंद नसलेला ऊस शिल्लक आहे. भविष्यात अशी अडचण निर्माण होणार नाही यासाठी शेतकऱ्यांनीही ऊस हा विषय दूध धंद्याप्रमाणे न करता कारखान्याला ऊस देण्याविषयी कारखान्याशी निष्ठा ठेवणेही गरजेचे आहे. असे मत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले की, यावर्षी उसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली. प्रत्येक कारखान्याचे उच्चांकी गाळप झालेले आहे. एवढे गाळप होईल हे कारखानदारांनाही अपेक्षित नव्हते. त्यामुळे कारखानदारांना दोष देण्यात काही अर्थ नाही. अजून जेथे ऊस शिल्लक आहे तेथे कारखाने सुरु आहेत. जेथे ऊस संपला ते कारखाने बंद होत आहेत. राहिलेला ऊस हा बिगर नोंदीचा आहे. एक तर तो पहिल्यांदा लावलेला असावा, किंवा त्या कारखान्याला कधी घातलेला नसावा. आधी दुसऱ्या कारखान्याला घालत होते, मात्र जो कारखाना ऊस न्यायचा त्या कारखान्याकडे जास्तीचा ऊस झाल्याने ते कारखाने नेते नाहीत, म्हणून ते आपल्या जवळच्या कारखान्यावर दोष दाखवत असल्याचे पहायला मिळत आहे.

नोंदी नसलेल्या शेतकऱ्यांत संभ्रम आहे. ज्या वेळी ऊस कमी पडतो त्यावेळी कारखान्यानाही मोठा त्रास सोसला आहे. त्यामुळे भविष्यात असा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ही शिकवणही आहे. नोंद असो व नसो, शेतकऱ्यांनी कारखान्याशी निष्ठा ठेवली पाहिजे. दूध व्यवसायात ज्या लोकांनी दूध संस्था बनवल्या, मात्र ज्यांनी जास्ती दर दिला तिकडे दूध घालायची पद्धत तयार झाली. तेथे निष्ठा राहिली नाही. दूध धंद्यासारखे साखर धंद्यात व्हायला नको.

पूर्वी साखर कारखान्यांना त्यांचे कार्यक्षेत्र होते. त्यातील सर्व ऊस गाळपाची त्यांची जबाबदारी होती. ऊस घालण्याबाबत निर्बंध उठल्यामुळे सगळे आपापल्या सोयीने ऊस घालायला लागले. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्येक कारखान्याची ऊस घेण्याबाबतची मर्यादी निश्चित झाली पाहिजे. उसाची पळापळ थांबली पाहिजे. कारण एकेकाळी साखर कारखान्यांनी मोठा फटका सोसला आहे. अहमदनगर जिल्ह्यात काही अपवाद सोडले. ते बहुतांश कारखाने सहकारी आहेत. सभासदांच्या मालकीचे आहेत, असेही त्यांनी सांगितले.

पुणतांब्याची ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात

खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, शेतकरी प्रश्नांवर पुणतांबा येथील नागरिकांनी मांडलेले मुद्दे आणि भाजपने केलेल्या आंदोलनातील मुद्दे सारखेच आहेत. पुणतांबा येथे सुरु होत असलेल्या आंदोलनात सर्वपक्षीय नेते आहेत. गावांने मांडलेले मुद्दे रास्त आहेत. ऊस न तुटलेल्या शेतकऱ्यांना एकरी दोन लाखांची मागणी केलीय, राज्य सरकार तेवढी मदत देईल असे वाटत नाही, कारण सत्तेत यायच्या आधी जे आताचे राज्यातील सत्ताधारी बोलले होते. त्याचा नंतर विसर पडतोय. पुणतांब्याची ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आहे. असे असलेतरी तेथील ग्रामपंचायत सदस्यांना त्यांचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आम्ही दिले आहे. मात्र पुणतांब्याच्या आंदोलनाबाबत भाजपची भुमिका ठरविण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील, असेही डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT