Sujay Vikhe Patil, Rohit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sujay Vikhe On Rohit Pawar: ...तर त्यांना 'स्पीकर'च्या जागेवर बसावं लागलं असतं ! सुजय विखेंचा रोहित पवारांना टोला

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी वेळ आणि संधी न मिळाल्याने युवकांचे अनेक प्रश्न मांडता आले नसल्याची खंत व्यक्त केली. सभागृहात युवा आमदारांना अधिकची संधी मिळावी, तसेच युवा आमदारांची संख्या वाढली पाहिजे असेही पवारांनी अपेक्षा व्यक्त केली.

पवारांच्या या विधानांची खिल्ली उडवत भाजप खासदार सुजय विखे पाटलांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. पवार आणखी काही बोलले असते तर त्यांना अध्यक्षांच्या जागेवर बसावे लागले असते, असा टोला विखेंनी लगावला आहे. विखेंच्या टीकेनंतर नगरमधील भाजप आणि शरद पवार गटात कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. (Latest Political News)

अहमदनगरमधील अमृत भारत योजनेच्या पायाभरणी समारंभानंतर माध्यमांशी बोलताना सुजय विखेंनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. विखे म्हणाले, "या अधिवेशनात रोहित पवारच तर सर्वात जास्त बोलले आहेत. एवढे बोलले की जरा अजून बोलले असते त्यांनाच स्पीकरच्या जागेवर बसवावे लागले असते. संपूर्ण अधिवेशनात त्यांनीच कॅमेऱ्याचे लक्ष वेधले होते. यामुळे युवा आमदारांना संधी मिळत नाही हे म्हणणे चुकीचे आहे," असेही खासदार विखेंनी सांगितले.

युवा आमदारांची संख्या वाढावी, या पवारांच्या विधानावर विखे म्हणाले, "आमदार हा आपल्या कामाच्या रूपाने ओळखला जातो. सर्व युवा आमदार चांगले आहेत असे नाही आणि सर्व ज्येष्ठ आमदार नालायक आहेत अशातलाही भाग नाही. आपली वैचारिकता, संस्कृती, सुसंस्कृतपणा, लोकांची विश्वासहर्ता यावर जनता लोकप्रतिनिधींची निवड करते. चांगले काम केले तर परत निवडून देते नाहीतर घरी बसवते. त्यामुळे केवळ युवा आमदारच चांगले काम करू शकते या मताचा मी नाही," असेही विखेंनी सुनावले.

कर्जत 'एमआयडीसी' वादावर बोलताना विखे म्हणाले, "हा वाद दोन लोकप्रतिनिधींतील आहे. त्यात मी तिसरा काही बोललो तर विषय दुसरीकडेच जाईल. वेळ आल्यावर यावर काय मार्ग आहे त्यावर जरूर बोलेल," असे सांगत मूळ मुद्याला कोणीही हात घातला नाही. "या ठिकाणी 'एमआयडीसी' झाल्यावर कोणते उद्योग येण्यास तयार आहे, त्यावर कोणी बोलत नाही. उद्योग आले नाही तर जिल्ह्यातील घोडेगाव, राहुरी आदी 'एमआयडीसी'सारखीच अवस्था व्हायची", याकडे खासदार विखेंनी लक्ष वेधले.

अहमदनगर ते पुणे इंटरसिटी अशी रेल्वे लवकरच सुरू होणार असून बाकीच्या इतर रेल्वेच्या वाढीव फेऱ्यांबाबतही लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वासही सुजय विखेंनी व्यक्त केला.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT