Sangli, 07 July : सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत शिवसेना नेते तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक तानाजी पाटील यांनी मोठ्या थाटात उमेदवारी अर्ज भरला होता. आमदारकीसाठी त्यांनी शड्डू ठोकला खरा; पण महायुतीधर्माचे पालन करत त्यांना निवडणुकीतून माघार घ्यायला लावण्यात आली. माघार घेताना त्यांना नेतेमंडळींनी शब्द दिल्याची चर्चा होती. त्यानुसार विधान परिषदेतील माघारीची बक्षिसी तानाजी पाटलांना अवघ्या महिनाभरातच मिळाली आहे.
विधान परिषदेची सांगली-सातारा ही जागा महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला गेली होती. पण या मतदारसंघातून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक तानाजी पाटील इच्छूक होते. त्यांनी शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्जही दाखल केला होता. मात्र, ही जागा भाजपच्या वाट्याला गेली होती.
भाजपकडून धैर्यशील कदम यांनी उमेदवारी देण्यात आली होती. शिवसेनेची या मतदारसंघात नाराजी होती. मात्र अखेरच्या क्षणी शिवसेनेची नाराजी दूर करण्यात भाजपला यश आले होते. शिवसेना नेत्यांच्या आदेशामुळे महायुतीधर्माचे पालन करत तानाजी पाटील यांनी अखेर माघार घेतली. माघारी घेताना तानाजी पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांना योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी संधी देण्याचा शब्द दिल्याची चर्चा होती.
तानाजी पाटील यांनी माघार घ्यावी, यासाठी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सूत्रे हलवली होती. शिवसेना, भाजप नेत्यांच्या आदेशानंतर तानाजी पाटील यांनी माघार घेतली. त्या माघारीचे बक्षीस तानाजी पाटील यांना अवघ्या महिनाभरातच मिळाले आहे.
सांगली जिल्हा नियोजन समिती सदस्यांची सोमवारी (ता. ०६ जुलै) नियुक्ती करण्यात आली. महायुतीमधील सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या वाट्याला ७, शिवसेनेला ३, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २ जागा आल्या आहेत. याशिवाय रिपाईं आठवले गट, जनसुराज्य आणि रयत क्रांती संघटनेलाही चंद्रकांतदादांनी संधी दिली आहे.
शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या तीन जागांपैकी एका जागेवर जिल्हा बॅंकेचे संचालक तथा शिवसेना नेते तानाजी पाटील यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे भाजपने आपला शब्द पाळत विधान परिषद निवडणुकीतून माघार घेत मदत करणाऱ्या तानाजी पाटील यांची जिल्हा नियोजन समितीवर संधी दिली आहे.