Adinath Sugar Factory-Tanaji Sawant
Adinath Sugar Factory-Tanaji Sawant Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

‘आदिनाथ’साठी सावंतांनी ९ कोटी रुपये भरले; बारामती ॲग्रोच्या अडचणी वाढण्याची शक्यता

आण्णा काळे

करमाळा (जि. सोलापूर) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना (Adinath Sugar Factory) सहकारी तत्त्वावर सुरू करण्यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी स्वतः तब्बल ९ कोटी रूपये भरले आहेत. सावंत यांनी हे पैसे भरल्यानेच कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू करण्याची संधी तालुक्याला मिळाली आहे. आदिनाथ कारखाना सहकारीच राहिला पाहिजे, यासाठी माजी आमदार नारायण पाटील (Narayan Patil) यांनी  उघड भूमिका घेतली होती. राज्यात सत्तापरिवर्तन होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला. माजी आमदार पाटील यांच्या मागणीला सत्ताधारी मंडळींनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानेच आदिनाथ सहकारी राहण्यास मदत झाली आहे. (Tanaji Sawant paid Rs 9 crore for Adinath Sugar Factory)

आदिनाथ सहकारी कारखान्यावरील मंदिरात रविवारी (ता. २८) आदिनाथ महाराजांना अभिषेक करून कारखान्याच्या दुरुस्ती कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी माजी आमदार नारायण पाटील म्हणाले की, आदिनाथ कारखान्याची एवढी दुरावस्था झालेली असतानादेखील  आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी कारखान्यासाठी नऊ-दहा कोटी रुपये भरले. त्यामुळेच आज अदिनाथ कारखाना आपण सुरू करत आहोत. चालू हंगामात कारखाना सुरू करून  पाच लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखान्यांबाबत बागल व आम्ही एकत्र काम करण्याच्या सूचना सावंत यांनी आम्हाला केली आहे, त्याप्रमाणे भविष्यात कारखान्याचे कामकाज केले जाणार आहे.

हरिदास डांगे,  देवानंद बागल, जयप्रकाश बिले  यांची भाषणे झाली. साडे येथील ऊस उत्पादक शेतकरी दत्ता जाधव यांनी कारखान्यासाठी एक लाख रुपये रोख मदत या वेळी दिली.  या वेळी ऊस उत्पादक शेतकरी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आदिनाथ कारखाना राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय  घेण्यात आला होता. गेली तीन वर्षांपासून हा विषय सुरू होता. एनसीडीसीचे 25 कोटी कर्ज कारखान्यावर आहे, हे आम्हाला माहिती नाही, असे सांगून बारामती ॲग्रोने वेळकाढूपणा केला. त्यानंतर मात्र बारामती ॲग्रोला कारखाना देण्यास सत्ताधारी मंडळी बागल गट, आदिनाथ बचाव यांनी विरोध करण्यास सुरुवात केली. त्यातच राज्यात सत्तापरिवर्तन होताच माजी आमदार पाटील यांनी जोर लावला आणि भाडेतत्त्वावरील प्रक्रिया थांबवली.

या सर्व प्रक्रियेत शिखर बँकेच्या ओटीएस योजनेत समावेश करण्यासाठी बँकेच्या खात्यावर जी रक्कम भरायची होती. ती रक्कम भरण्याची जबाबदारी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी घेतली. त्यांनी सुरुवातीला एक कोटी आणि त्यानंतर ८ कोटी, असे ९ कोटी रुपये बॅकेच्या खात्यावर भरले. सुरुवातीला सत्ताधारी बागल गट कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या विरोधात डीआरटी कोर्टात गेला. डीआरडीओ कोर्टानंतर उच्च न्यायालय असा प्रवास केला.

आदिनाथ कारखाना हा बारामती ॲग्रोलाच चालवायला मिळाला पाहिजे, यासाठी न्यायालयाचे दार ठोठावले आहे. याबाबत २६ ऑगस्टला सुनावणी झाली. आता १९ सप्टेंबर ही पुढची तारीख देण्यात आली आहे. आदिनाथ बचाव समिती व विद्यमान सत्ताधारी बागल गट यांनीही आदिनाथ सहकारी साखर कारखाना सहकारी तत्त्वावरच सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT