Sangola News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangola News : बंडखोरीचे वादळ आता सांगोल्याच्या द्वारावर; गणपतआबांच्या नातवाला स्वकीयांकडून आव्हान

दत्तात्रय खंडागळे

Sangola News : राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजीचे वादळ घोंगावत असतानाच शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या सांगोला तालुक्यातही शेकापमध्ये बंडखोरीची लागण होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सांगोल्यात शेकापमधील विविध नेत्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन थेट नेतृत्वालाच आव्हान दिले आहे.

राज्यात शिवसेना फुटीचे वादळ शमते तोच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ncp) फुटीचा धुरळा उडाला. आता राष्ट्रवादी कुणाची हा प्रश्न राज्यभरात चर्चिला जात असतानाच एकेकाळी महाराष्ट्रातील सर्वात प्रबळ विरोधी पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षालाही बंडखोरीची लागण होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. सावे (ता. सांगोला) येथे शनिवार (दि. ८) रोजी तालुक्यातील अनेक नेतेमंडळी व विविध गावच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन शेकापचे सध्या नेतृत्व करीत असलेले डॉ. बाबासाहेब देशमुख (Dr. Babasaheb Deshmukh) यांना थेट इशारा दिला.

या बैठकीत शेतकरी कामगार पक्षाच्या चिटणीस मंडळाचे सदस्य बाबासाहेब कारंडे, माजी सभापती बाळासाहेब काटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख, माजी उपसभापती संतोष देवकते, शाहू मेटकरी, हणमंत कोळवले, अमोल खरात, कोकरे सर आधी प्रमुख नेत्यांसह विविध गावचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना बाबा कारंडे म्हणाले, प्रसंगी पक्ष विकू पण आम्हाला आमदार व्हायचे हीच सध्या काहींची भूमिका दिसून येत आहे. काहींच्या स्वार्थासाठी आघाडी आणि तडजोडी करण्याच्या नादात पक्षाचे नुकसान होत आहे. जातीपातीचे राजकारण केले नाही आणि करणार नाही ही आबासाहेबांची शिकवण आहे. मात्र, अन्याय खपवून घेणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख म्हणाले, शेकापमधे जातीयवाद वाढला आहे. तो नाही संपला तर पक्ष संपायला वेळ लागणार नाही. असेच नेतृत्व कायम राहिले तर कधीच आपला पक्ष सत्तेत येणार नाही. आबासाहेबांच्या शेवटच्या दिवसात तुम्ही कुठे होता? असा थेट सवालही त्यांनी केला आहे. पंचायत समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब काटकर म्हणाले की पक्षांमध्ये आज हिटलरशाही निर्माण झाली. फोटो वरूनही पक्षातफळी निर्माण होत असून भविष्यात आम्ही कोणताही निर्णय घेऊ शकतो.

प्रास्ताविक करताना पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष देवकते म्हणाले, राज्यात पुत्रप्रेम आणि रक्ताच्या वारसाला प्राधान्य देण्याच्या नादात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ही अवस्था झाली, असा आरोप त्यांनी केला. आपला पक्ष शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा प्रबळ नाही. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही नेतृत्वाने याची गंभीर दखल घ्यावी, अन्यथा याची जबर किंमत मोजावी लागेल.

माणगंगा साखर कारखान्याच्या संचालक पदाच्या निवडीमध्ये निश्चितपणे व्यवहार झाला आहे. हे कारखान्याच्या संचालक पदाच्या निवडणुकीत व्यवहार करत असतील तर उद्या आमदारकीचाही व्यवहार करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. आता कशासाठी कोंबडं झाकून ठेवताय. दोन महिने थांबणार आहे, जर मस्ती केली तर सोडणार नाही, असा इशारा देवकते यांनी दिला.

पक्षातच जिरवा जिरवी सुरू आहे

या बैठकीमध्ये अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सध्या शेकाप पक्षातच जिरवा जिरवीची भाषा सुरू आहे. नेतृत्वच पक्षात जिरवा - जिरवीची भाषा करीत असेल तर पक्ष वाढेल कसा?- अशी चिंता मान्यवर नेत्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT