MLA Jaykumar Gore
MLA Jaykumar Gore sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मला अडकविण्यात राष्ट्रवादीचेच षडयंत्र; जशास तसे उत्तर देणार...जयकुमार गोरे

Umesh Bambare-Patil

सातारा : मायणी मेडिकल कॉलेजचे विश्वस्त एम.आर. देशमुख हे निमित्त असून माझ्यावर राजकिय आकसातून गुन्हे दाखल केले आहेत. त्यामागे संपूर्ण राष्ट्रवादी असून सभापतींच्या केबिनमध्ये याबाबतच्या बैठका झाल्या असा आरोप करून्र माझा पिंडच राजकीय संघर्षाचा असून मला कोणीही थांबवू शकत नाही. आमने सामनेचा संघर्ष करण्याची धमक राष्ट्रवादीच्या नेत्यांत नाही. आता त्यांच्या या राजकीय षडयंत्राला जशास तसे उत्तर देणार आहे, असा इशारा माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी दिला आहे.

दरम्यान, एक दिवस माझे निर्दोषत्व नक्कीच सिद्ध होईल मात्र एवढ्या हिणकस पातळीवर जाऊन राजकारण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी करू नये व पोलिसांनी माझ्यावर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात जी तत्परता दाखवली तीच तत्परता मायनी मेडिकल कॉलेजच्या गैरव्यवहाराच्या प्रकरणात दाखवावी कोणाच्या राजकीय दबावा मध्ये पोलिसांनी तपास करू नये आपला सचिन वाझे होणार नाही याची काळजी पोलिसांनी घ्यावी असे आवाहनही गोरे यांनी यावेळी तपास यंत्रणांना केले.

न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर आमदार जयकुमार गोरे यांनी आज शासकिय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, धैर्यशील कदम, भाजपचे शहराध्यक्ष विकास गोसावी उपस्थित होते. आमदार गोरे म्हणाले, मायणी मेडिकल कॉलेज मी चालवायला घेतले नव्हते तशी माझी इच्छाही नव्हती. कॉलेजचे विश्वस्त एम. आर. देशमुख स्वतःहून माझ्याकडे आले होते. ते अडचणीत असल्याने मदत करण्याची विनंती करत होते.

मेडिकल कॉलेज कर्जबाजारी असून एमबीबीएसची परवानगी नव्हती. तेथील जमिनी अकृषक नव्हती. तरीही एमबीबीएसचे शंभर जागांची त्यांची परवानगी असताना साडे नऊशे विद्यार्थ्यांचे ॲडमिशन घेण्यात आले. या ॲडमिशन पोटी प्रत्येक विद्यार्थ्याकडून 10 ते 50 लाखापर्यंतची फी जमा करून संबंधित ट्रस्टने 68 ते 70 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप जयकुमार गोरे यांनी केला. या मेडिकल कॉलेजच्या निमित्ताने येथे प्रांत जिल्हाधिकारी यांचे बोगस शिक्के बनवून विद्यार्थ्यांचे प्रवेश पात्र ठरण्यासाठी बोगस गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र बनवण्यात आले.

७५० विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी २५, ३० व ५० लाख रूपये घेतले आहेत, याची यादीत आमच्याकडे आहे. मायणी मेडिकल कॉलेजच्या उभारणीत प्रचंड गुंतागुंत आहे. कॉलेजच्या इमारतीची किंमत 45 ते 50 कोटी रुपये असून त्या कॉलेजवर तब्बल दीडशे कोटी रुपयांचे कर्ज आहे. असे असताना आम्ही त्यात लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाच्या माध्यमातून कॉलेजला 20 कोटी रुपयांचा दंड केला.

विद्यार्थ्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातूनच नव्या मॅनेजमेंटच्या अटीवर आम्ही हे कॉलेज ट्रस्टी म्हणून चालवायला घेतले आणि आयुष्यात पहिल्यांदा या कॉलेजच्या उभारणीसाठी जयकुमार गोरे यांनी स्वतःच्या नावावर कर्ज घेऊन या कॉलेजचे देणी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, देशमुखांनी कर्ज करायची आणि ती जयकुमारने फेडायची असे होणार नाही. प्रत्येक गैरव्यवहाराचा हिशोब हा झालाच पाहिजे. याकरिता या प्रकरणाची केंद्रीय गुप्तचर यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी, यासाठी प्रस्ताव दिला होता. मात्र या प्रकरणाची दीड वर्षापूर्वी तक्रार करूनही जिल्हा पोलिसांनी या प्रकरणाचा कोणताही तपास केला नसल्याचा आरोप त्यांनी केला.

या कॉलेजच्या निमित्ताने अनेक बोगस डॉक्टर तयार झाले असून देशमुखांच्या घरातच पाच बोगस डॉक्टर आहेत. आर्थिक गैरव्यवहार कसा करावयाचा हे शिकण्यासाठी देशमुख परिवाराकडून नक्कीच प्रशिक्षण घ्यावं असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. जमिनीच्या बोगस दस्त व्यवहारासंदर्भात बोलताना आमदार गोरे पुढे म्हणाले या प्रकरणांमध्ये माझी सही व शपथपत्र हे संपूर्णपणे खोटे आहे. यामध्ये जर मी अपराधी साबित झालो तर मी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईन.

ज्या तहसीलदाराने मान्य केले त्याच्यावर आपण गुन्हा दाखल करणार असल्याचे पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले मूळ तक्रारदार हा अत्यंत गरीब असून त्याचे नुकसान होईल असे कोणतेही वर्तन आम्ही केलेले नाही त्याची तक्रार करण्याची इच्छा नव्हती या प्रकरणांमध्ये जयकुमार गोरे याला कसे अडकवता येईल या माध्यमातून या तक्रारी दाखल केल्या जात आहेत. मात्र आमदार जयकुमार गोरे हा घाबरणारा नाही. माझा मूळचा पिंड संघर्ष करण्याचाच आहे. या वेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझ्या विरोधात रचलेले हे राजकीय षड्यंत्र असून अत्यंत हीन पातळीवर जाऊन माझ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

याचा त्रास अगदी माझ्या कुटुंबियांपासून ते कार्यकर्त्यांना भोगावा लागला आहे. निखळ राजकारणाची क्षमता राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाही. भाजपचा आमदार जयकुमार गोरे व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ही जोडी राजकारणात पुढे येत आहे हे काही जणांच्या पोटात दुखते म्हणून त्यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादीच्या या खेळ्या सुरू आहेत. ज्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले. त्या संदर्भातल्या सरकारी वकिलांची फी सभापतींच्या केबिनमधील दिली जाते व त्याची प्लॅनिंग सुद्धा त्यांच्या केबिनमध्ये ठरते, असा आरोप श्री. गोरे यांनी केला.

यांच्यात जर धमक असती तर त्यांनी समोरासमोरच्या संघर्ष केला असता पण त्यांच्यात ती कुवत नसल्याने देशमुखांच्या आडून माझ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला आहे पण मी आता गप्प बसणार नाही राष्ट्रवादींच्या या षड्यंत्राचा जशास तसे उत्तर देणार आहे. जे लोक काचेच्या घरात राहतात त्यांनी काँक्रिटच्या घरात राहणाऱ्या यांच्या घरावर दगड मारू नयेत, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला. पोलिसांनी राजकीय दबाव तंत्रामध्ये न येता सर्वसामान्यांच्या गुन्ह्यांचा निष्पक्ष तपास करावा.

माझ्या मेहुणीवर रात्री चार वाजता गुन्हा दाखल करून सकाळी सात वाजता मुंबईत अटक करण्यासाठी पोहोचणारे सातारा पोलिस मायणी मेडिकल कॉलेजच्या बोगस प्रकरणाची दीड वर्ष तक्रार करून तपास का करत नाहीत. यातच काय समजायचे ते समजते पोलिसांनी आपला सचिन वझे होणार नाही याची काळजी घ्यावी. कारण वेळप्रसंगी कोणताही उच्चपदस्थ मंत्री आपल्याला वाचवायला येत नाहीत.

आमदार गोरे यावेळी म्हणाले, या सर्व प्रसंगात माझा पक्ष माझ्यासोबत संपूर्ण ताकतीने उभा असून या संपूर्ण प्रकरणांमध्ये मी आजपर्यंत कधी तडजोड केली नाही. प्रभाकर घार्गे हे माझे कट्टर विरोधक आहेत. तरीसुद्धा त्यांना माणुसकीच्या नात्याने भेटायला मी कारागृहामध्ये गेले होतो. जर मी रामराजे यांच्याशी तडजोड केली असती तर जिल्हा बँकेत माझे ही तीन संचालक दिसले असते. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमने-सामने ची लढाई करावी असे बायकी पद्धतीचे गुन्हे दाखल करून आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये. त्यांचा मुकाबला करण्यासाठी आमदार जयकुमार कायमच सज्ज आहे, असे आव्हान गोरे यांनी दिले.

दम असेल तर माढातून लढा....

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, आमच्या दोघांवर तक्रार करण्याचा एकच मुहूर्त काढण्यात आला होता माझ्यावर तर तब्बल 40 केसेस दाखल करण्यात आले आहे. त्याच्यामध्ये पाच लिटर पेट्रोलच्या चोरीचा गुन्हा सुद्धा दाखल आहे. माझ्यावर उरल्यासुरल्या सर्वच कलमांचे गुन्हे दाखल करा म्हणे त्यांची संख्या शंभर होईल, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. जर फलटणकर यांच्यात दम आहे तर त्यांनी 2024 ची आगामी लोकसभा निवडणूक लढवून दाखवावी, असे खुले आव्हान त्यांनी सभापती रामराजेंना दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT