Congress Leader Balasaheb Thorat
Congress Leader Balasaheb Thorat Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राज्य सरकार नागरिकांना थोडी मदत करून खिशातून मोठी रक्कम काढतेय

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे गट व भाजपचे सरकार सत्तेत आले आहे. अशा स्थितीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील शिंदे गट व भाजप सरकारवर टीका केली. ( The state government is taking a large amount out of the pockets of the citizens with a little help )

बाळासाहेब थोरात म्हणाले की, नवीन युतीचे सरकार आल्यापासून त्यांनी आम्ही घेतलेले निर्णय बदलण्याचंच काम केलेलं दिसतं आहे. त्यांनी राज्यातील निर्णय घेतला की, निवडणुका जाहीर झालेल्या नगरपालिका, ग्रामपंचायतीत जनतेतून थेट नगराध्यक्ष, सरपंच निवडून येणार आहेत. या पूर्वी हा प्रयोग झाला आहे. त्या प्रयोगाचे फलित काय? हे जाणिव पुर्वक तपासले पाहिजे. या पूर्वी नगराध्यक्ष एका पक्षाचा व बहुमतातील नगरसेवक दुसऱ्या पक्षाचे अशी स्थिती झाली होती. तिथे कुठेही शांतता नाही अशी अवस्था झाली होती. नगरसेवकांना आपले जे काही संघटितपणे केले काम दाखविण्याची संधी असते. ती संधी मिळणार नाही. या पद्धतीने शांतेत नगरपालिका व ग्रामपंचायतीचा कारभार चालला आहे का? याचा त्यांनी विचार केला असता तर त्यांनी हा निर्णय घेतला नसता, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती. या संदर्भात त्यांनी सांगितले की, त्यांनी डिझेलला 3 रुपये व पेट्रोलला 5 रुपये दर कमी केले. मात्र हे करत असताना त्यांनी विजेचे दर 20 टक्क्यांनी वाढविले, हे सांगितलेच नाही. इंधनावरील दर कमी करत असल्याचे सांगता. मात्र विजेचे दर वाढविले हे सांगण्याचे टाळलेले दिसते आहे. नागरिकांना थोडी मदत करत असताना नागरिकांच्या खिशातून मोठी रक्कम काढून घेण्याचा हा प्रकार आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

राज्यात नैसर्गिक संकट असताना मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. यावर ते म्हणाले, त्यांनी आतापर्यंत मंत्रीमंडळ विस्तार करायला हवा होता. मात्र माझ्या मते त्यांचे आपसातील वाद मिटत नाहीत. ते सर्वोच्च न्यायालयाचे कारण देत आहेत. मात्र प्रत्यक्षात त्यांचे आपसातील वाद मिटत नाहीत, असे मला दिसते आहे. दोघांचेच मंत्रीमंडळ आहे मग मंत्रीमंडळ विस्ताराचा निर्णय तरी लवकर व्हायला हवा होता, अशी कोरपखळीही त्यांनी मारली.

त्यांनी गडचिरोलीत जाऊन पूर परिस्थिती पाहिली. मात्र संपूर्ण महाराष्ट्र सध्या पूराच्या संकटात आहे. सुमारे 90 नागरिकांचे त्यात बळी गेले आहेत. या परिस्थितीचा आढावा दुर्दैवाने नव्या सरकारने घेतलेला दिसत नाही. त्याबाबतीतील जागृकता दिसत नाही. जनता मोठ्या आशेने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पाहत आहे. मात्र निर्णय तसे होताना दिसत नाहीत. शेतकऱ्यांच्या नियमित कर्ज भरण्याचा निर्णय आम्हीच घेतलेला होता, असे त्यांनी सांगितले.

आम्ही खुप चांगले निर्णय घेतले होते. ते थांबविण्याचा अथवा बदलण्याचा प्रयत्न त्यांना चाललेला दिसतो. हे सरकार केवळ आमचे निर्णय घेऊन ते बदलण्याचे काम करत आहेत. आमचे ते चांगले निर्णय बदलले जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT