Sangli News : राज्यात पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने खळबळ उडवून दिली असून यात प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर देखील अडचणीत आल्या आहेत. वैष्णवीची मोठी जाऊ असणाऱ्या मयुरी हगवणे यांच्या तक्रारीची योग्य ती दखल आयोगाने घेतली असती आज ही परिस्थिती उद्भवली नसती अशी टीका होताना दिसत आहे. अशातच सांगलीत रूपाली चाकणकर यांच्यासह तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि काही पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी गंभीर आरोप केले आहेत. याबाबत त्यांनी आज (ता.28) सांगलीत पत्रकार परिषद घेताना बलात्कार पीडित महिलेला देखील समोर आणले. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले असून पोलिस दलातील अधिकाऱ्यांसह देशमुख, चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच यासाठी आपण मुख्यमंत्री तथा ग्रहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागणार असल्याचेही तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.
यावेळी पीडित महिलेने, सांगलीतील कडेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक बिपीन हसबनीस यांनी 2021 मध्ये अत्याचार केला होता. याबाबत गुन्हाही दाखल झाला होता. पण तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आता दावा केला आहे. तर तृप्ती देसाई यांनी, हा दबाव टाकण्यासाठी आर्थिक आमिष दाखवत तब्बल दीड कोटी रूपयांची ऑफर दिल्याचा आरोप यावेळी केला आहे. तर देसाई यांनी यावेळी पीडितेने सांगितल्या प्रमाणे तत्कालीन अप्पर अधीक्षक मनीषा डुबुले आणि डिव्हाएसपी कृष्णात पिंगळे यांचीही नावे घेतली आहेत. या आरोपांमुळे आता जिल्ह्यात नव्याने हे प्रकरण चर्चेत आले आहे.
यावेळी देसाई यांनी, पीडितेला हे प्रकरण थांबवण्यासाठी अनिल देशमुख आणि रुपाली चाकणकर यांनी सह्याद्री अतिथीग्रह ऑफर दिली होती. गृहमंत्री आणि चाकणकर यांच्या सांगण्यावरूनच बलात्कार करणाऱ्या पोलीस निरीक्षक हसबनीसांसह अप्पर अधीक्षक डुबुले आणि डिव्हाएसपी पिंगळे तिच्यावर पाळत ठेवली होती. तर सांगलीतील हॉटेल सीजन फोरमध्ये नजर कैदेत ठेवल्याचाही आरोप केला आहे. संबंधित पीडितेनं तिला आजही त्रास दिला जात असून तिचा पाठलाग केला जातोय, तिचे रेकॉर्ड चेक केले जात असल्याचा दावा केला आहे.
दरम्यान संबंधित पीडितेनं यावरून महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्याकडे तक्रार केली असताना त्यांनी, राज्यात दररोज बलात्कार होतात मी कुठे कुठे लक्ष देऊ असे धक्कादायक उत्तर दिले. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी, रुपालीताईंकडे कामाचा बोजा जास्त आहे, त्यांना त्रास देऊ नका असे म्हटल्याचा दावाही केला आहे.
तर आत्तापर्यंत या पीडित महिलेने आयोगाकडे 530 इतके अर्ज केले असून तिला अद्याप न्याय मिळालेला नसल्याचे तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे. यामुळेच तिच्या न्यायासाठी पीडितेला घेऊन थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दरवाजा ठोठावणार असल्याचा इशाराच आता तृप्ती देसाई यांनी दिला आहे.
संबंधित पीडितेला न्याय देण्यासाठी तृप्ती देसाई यांनी पुढाकार घेतला असून पीडितेवर दबाव टाकून आमिष दाखवण्याचे सध्या प्रकार सुरू आहेत. यामागे तत्कालीन ग्रहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि संबंधित अधिकाऱ्यांचा हात आहे. यामुळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासह महिलांना न्याय देण्यास असमर्थ ठरलेल्या आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना हटवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.