Shivendraraje Bhosale, Udayanraje
Shivendraraje Bhosale, Udayanraje sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सातारा पालिकेत ५० जागा जिंकणार; मिशीला पीळ, ताव मारून होत नसतं... उदयनराजे

Umesh Bambare-Patil

सातारा : मनोमिलनाच्या काळात केवळ अडवाअडवी झाल्याने लोक हितासाठी आम्ही मनोमिलन तोडलं, असे सांगून सातारा पालिकेच्या मागील निवडणुकीत आमदारांच्या आघाडीचा एकमेव नगरसेवक निवडून आला होता. आता यावेळेस आमच्या सातारा विकास आघाडीचे ५० च्या ५० नगरसेवक सातारची जनता निवडून देईल, असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, केवळ मिशीला पीळ व ताव मारून होत नसतं, त्याला इकडं तिकडं फिरावं लागतं, असा टोला त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंना लगावला.

खासदार उदयनराजेंनी आज पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. त्यांच्या सातारा विकास आघाडीचे सर्वच्या सर्व म्हणजे ५० नगरसेवक सातारची जनता निवडून देईल, असा विश्वास व्यक्त करतानाच हिंमत असेल तर समोरासमोर येऊन निवडणूक लढावी, असे आव्हान त्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंना दिले.

खासदार उदयनराजे म्हणाले, मधल्या काळात काहींनी आम्हाला मनोमिलन करून टाका असे सांगितले. ते आम्ही मान्य करत सर्वांनी एकत्र राहावे, आपल्यातच स्पर्धा नको. विकास कामात सर्वांचा हातभार लागला पाहिजे, यासाठी मनोमिलन केलं. पण, पुढील पाच वर्षात मनोमिलनाच्या काळात केवळ आडवाआडवी झाली. त्यामुळे नाइलाजास्तव आम्ही मनोमिलन तोडलं. केवळ स्वतः च्या स्वार्थासाठी नव्हे तर लोकांच्या हितासाठी आम्ही मनोमिलन तोडलं. त्यामध्ये आमचा स्वार्थ होता.

आपल्याला कोणी नको, एकटेच सगळे निर्माण करू. त्यासाठी आमच्या नगरसेवकांच्या मदतीने हे सर्व झाले.उदयनराजे पुढे म्हणाले, त्यानंतरच्या निवडणूकीत सातारच्या इतिहासात नव्हे तर महाराष्ट्राच्या इतिहासात लोकांनी एवढा मोठा त्यांच्या विरोधात कौल दिला. ४० पैकी एक अपक्ष, ३८ साविआ आणि एक चुकून माकून आमदारांच्या नगर विकास आघाडीचा नगरसेवक निवडून आला. त्यावेळेस त्यांचा एक नगरसेवक आला.

आता यावेळेस ५० च्या ५० सर्व उमेदवार काम करणारे, लोकांसाठी झटणारे आम्ही देणार आहोत. त्यामुळे ५० च्या ५० सातारा विकास आघाडीचे नगरसेवक सातारची जनता निवडून देणार आहे, असे भाकित त्यांनी केलं. शिवेंद्रसिंहराजेंवर टीका करताना ते म्हणाले, आम्ही काय केलं नाही, भविष्यकाळात करू काही तरी, असे हे त्यांचे भविष्य. त्यांची एकही जागा निवडून येणार नाही. कारण लोक त्यांना स्विकारणार नाहीत.

निवडणुकीचा निकाल आताच लागलेला आहे. त्यांनी आता निवडणुकीला सामोरे यावे, हिंमत असेल तर त्यांनी आजच्या आज आम्हाला प्रतिउत्तर द्यावे. त्यापेक्षा थोडी तयारी करा. मिशीला पीळ व ताव मारून होत नसतं. इकडे तिकडे फिरावे लागतं. आम्ही नगरसेवक पदापासून सुरवात केली आहे. मी अलगद आमदार झालेलो नाही. मागील वेळेस सर्वसामान्य उमेदवार पालिकेचा अध्यक्ष झाला, याचे कारण हेच आहे. लोकांना आता त्यांचा विट आला आहे, अशी टीकाही उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजे व त्यांच्या नगरविकास आघाडीवर केली. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तुम्हा दोघांना एकत्र येऊन निवडणूक लढा असे सांगितले तर, त्यावर उदयनराजे भडकले व म्हणाले, ज्या त्यावेळी बघू ना तुम्ही का उतावीळ झालायं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT