Udayanraje Bhosale, Balasaheb Patil, Shashikant Shinde
Udayanraje Bhosale, Balasaheb Patil, Shashikant Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

उदयनराजे, शिवेंद्रराजेंना जमले, ते सहकारमंत्री, शशिकांत शिंदेंना का जमले नाही...

सरकारनामा ब्युरो

सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची पाठ धरून सर्व अस्त्रे वापरून विरोध असूनही बँकेत बिनविरोध प्रवेश केला. पण सर्व प्रकारची ताकत असूनही सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व आमदार शशिकांत शिंदे यांना बिनविरोध निवडून येता आले नाही. कराडात उदयसिंह पाटील तर जावळीत ज्ञानदेव रांजणे यांनी या दिग्गज नेत्यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे. सहकार मंत्र्यांना आपला हेकेखोरपणा तर शशीकांत शिंदे गाफिलपणा नडल्याचीच चर्चा सध्या जिल्ह्यात आहे.

मुळात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना जिल्हा बँकेच्या पुढच्या दराने निवडून येऊन संचालक व्हायचे होते. तसेच मागील निवडणुकीतील पराभवाचा बदला घ्यायचा होता. त्यासाठी त्यांनी दिवंगत माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकर यांचा कराड सोसायटी मतदारसंघ निवडला. तसेच ते बँका व पतसंस्था आणि गृहनिर्माण आणि दुग्ध संस्था मतदारसंघातून निवडून येऊशकले असते. पण, या पूर्वी झालेला पराभव डोळ्यासमोर होता. विलासकाकांच्या निधनानंतर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कराड सोसायटी मतदारसंघातुन निवडून जाऊन संचालक होण्याचा चंग बांधला होता.

विलासकाकांच्या निधनानंतर कराड सोसायटी मतदारसंघातुन त्यांचे सुपुत्र उदयसिंह पाटील यांना राष्ट्रवादीने संधी दयायला हवी होती, असे सर्वांचेच म्हणणे होते. पण सहकार मंत्री येथील लढणार असल्याने उदयसिंह पाटील यांच्याकडे कोणी फारसे लक्ष दिले नाही. पण बँकेच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी उदयसिंह पाटील यांनी अर्ज दाखल केला. त्यामुळे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची अडचण झाली. तरीही त्यांनी उदयसिंह पाटील यांना दुसऱ्या मतदारसंघाचा पर्याय सांगीतला पण त्यांनी तो ऐकला नाही, पर्यायाने अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत उदयसिंह पाटलांचे मन वळवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे नेते करत होते. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील उदयसिंह पाटलांची मनधरणी केली. पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. 

त्यामुळे आता कराड सोसायटीतून सहकार मंत्री विरुद्ध उदयसिंह पाटील अशी कट्याची लढत होत आहे. बाळासाहेब पाटील यांनी थोडे मोठे मन दाखवत उदयसिंह पाटील यांना कराड सोसाटीतून लढायला सांगून स्वतः गृहनिर्माण व दुग्ध संस्था मतदारसंघ किंवा नगरी बँका आणि पतसंस्था मतदारसंघातुन निवडणूक लढली असती तरी चालले असते. पण सहकार मंत्री यांना त्यांचा हेकेखोरपणा नडला. कोणत्याही परिस्थितीत विलासकाकांच्या मुलाला बँकेत येऊन देणार नाही, अशी काहीशा भूमिकेमुळे आज सहकार मंत्री सर्व राजकिय ताकत असूनही बिनविरोध होऊ शकले नाहीत.

अशीच काहीशी परिस्थिती जावळी सोसायटी मतदारसंघाची आहे. येथून आमदार शशिकांत शिंदे यापुर्वी निवडून आलेले आहेत. पण त्यांनी मध्यनंतरी जावळीत लक्ष घालून तेथे पुन्हा संपर्क सुरू केला. जावळी मतदारसंघातूनच शशिकांत शिंदे पहिल्यांदा आमदार झाले. पण मतदारसंघ पुनर्रचनेत जावळी रद्द झाला व तो साताऱ्याला जोडला.  त्यामुळे शरद पवार यांनी त्यांना कोरेगाव मतदारसंघातुन शालिनीताई पाटील यांच्या विरोधात लढविले. ते कोरेगावातून आमदार झाले. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांचा शिवसेनेचे नेते महेश शिंदे यांनी पराभव केला.

त्यामुळे शशिकांत शिंदे यांना विधान परिषदेवर घेतले, पण मागच्या दराने आमदारकी मिळाल्याने ते नाराज होते. त्यांचा कोरेगावतील पराभव आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे यांच्यामुळे झाला, अशी त्यांची धारणा झाली. तसेच सातारा जावळीत आमदार भाजपचा असल्याने खासदार शरद पवार यांच्या सूचनेनुसार  शशीकांत शिंदे यांनी सातारा जावळीत लक्ष घातले. त्याचा राग आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना आला व यातून या दोघात कलगीतुरा रंगला. हा वाद मिटविण्याचा प्रयत्न सभापती रामराजे यांनी केला. तो पर्यंत पुला खालून बरेचसे पाणी गेले होते. रांजणे यांनी मध्यन्तरी राष्ट्रवादीचा परळीत मेळावा घेतला होता. त्या कार्यक्रमाला आमदार शिंदे उपस्थित होते.

आमदार शशिकांत शिंदे यांना रोखण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हा बँकेत जावळी सोसायटीतुन ज्ञानदेव रांजणे यांना निवडणूक रिंगणात उतरविले. रांजणे यांनी अर्ज भरल्यानंतर त्यांचा अर्ज कडून घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खप प्रयत्न केले. पण रांजणे यांनी विजयाची गणिते जुळतील एवढे मतदार अज्ञातस्थळी रवाना केले. या सर्व घडामोडींबाबत शशिकांत शिंदे गाफील राहिले. शशिकांत शिंदे यांना बिनविरोध करण्यासाठी रांजणे यांचा अर्ज मागे घेणे महत्वाचे होते. पण ते आपल्या समर्थक मतदारांसह अज्ञातस्थळी रवाना झाले होते. त्यामुळे त्यांचा अर्ज राहिला.

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी सुद्धा आमची जावळीतील मते शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी राहतील असे सांगितले. पण वेळीच रांजणे यांना रोखले असते तर आज शशिकांत शिंदे बिनविरोध झाले असते. येथे आमदार शिंदे यांना त्यांचा गाफिलपणा नडला. ज्या गोष्टी उदयनराजे भोसले यांनी केल्या त्या मंत्री बाळासाहेब पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी केल्या असत्या तर हे दोघेही जिल्हा बँकेवर बिनविरोध निवडून गेले असते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT