Laxman Mane
Laxman Mane sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंनी भावाची समजूत काढावी... अन्यथा मी गुन्हा दाखल करणार

Umesh Bambare-Patil

सातारा : ''राज ठाकरे यांचे वक्तव्य धार्मिक तेढ निर्माण करणारे असून त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावाची समजूत काढावी. अन्यथा, घटनात्मक विधीमंडळ प्रमुख म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. त्यांनी गुन्हा दाखल केला नाही तर, प्रसंगी मी स्वतः त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे,'' असा इशारा पद्मश्री लक्ष्मण माने यांनी आज साताऱ्यात पत्रकार परिषदेत दिला आहे.

''राज्य सरकारला भोंग्याबाबत अल्टिमेट देणाऱ्या राज ठाकरे यांची औकात काय आहे,'' असा प्रश्न करून लक्ष्मण माने म्हणाले, ''ज्यांना हिंदू राष्ट्र हवे आहे. त्यांना माझे ओपन चॅलेंज आहे. त्यांनी सर्वसामान्य लोकांना फसवण्याचा धंदा बंद करावा. हिंदू राष्ट्राचा गळा काढणारे मूठभर लोक आहेत. अस्पृश्य, भटके, अल्पसंख्यांक, ख्रिश्चन, यहुदी, लिंगायत, जैन या जातींना हिंदू राष्ट्र हवे आहे का,'' असा प्रश्न माने यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले, ''डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जातींचा अभ्यास करून त्याचा समन्वय साधणारे भारतीय संविधान तयार केले. त्या संविधानावर आक्रमण करून भाजप देशात व राज्यात धुडगुस घातला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. केवळ ठाकरे घराण्यात जन्म घेतला आहे इतकेच. मात्र, त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे परिवर्तन चळवळीतील एक मोठे नेते होते. त्यांच्या विचारांचा आदर्श आणि वारसा राज ठाकरे यांनी घ्यावा.''

''मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर आम्ही तलवारी काढू, हे राज ठाकरे यांचे वक्तव्य धार्मिक तेढ निर्माण करणारे आहे. भारतीय दंड विधानाप्रमाणे हा फौजदारी गुन्हा आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी आवाहन करतो की त्यांनी आपल्या भावाची समजूत काढावी. अन्यथा, घटनात्मक विधीमंडळ प्रमुख म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. याबाबत मी स्वतः त्यांना पत्र लिहून तशी विनंती करणार आहे. कोणाची तरी सुपारी घेऊन राज ठाकरे काम करत आहेत.''

''घटनेच्या विरोधात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांचा प्रतिकार केला पाहिजे. देशात व राज्यात कायद्याचे राज्य आहे. पण, पंतप्रधान या राजकिय संवेदनशील परिस्थितीवर अवाक्षर काढायला तयार नाहीत. त्यांना जरा देखील लाज असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला या देशात फाळणी सदृश्य परिस्थिती निर्माण करायची आहे का,'' असा प्रश्न श्री. माने यांनी उपस्थित केला.

त्यासाठी 'आम्ही भारतीय लोक' हे अभियान महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने राबवणार आहोत. या अभियानाची सुरवात येत्या २१ एप्रिलला सकाळी अकरा वाजता साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसाचे उपोषण करून केली जाणार आहे. यामध्ये माझ्यावर हल्ला झाला तरी चालेल पण कोणीतरी या बेबंदशाहीला विरोध करायला हवा म्हणून मी या संघर्षात उरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT