Vaibhav Pichad Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vaibhav Pichad Exclusive : पवारसाहेबांचा फोन आला तर, मी त्यांना नाही कसे म्हणणार ? बोलणारच ! वैभव पिचडांची भूमिका

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे

Ahmadnagar News : राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार आमदारांच्या मोठ्या गटासह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. शरद पवार यांच्या गटातून अजित पवार गटात गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात नव्या नेतृत्वाची बांधणी सध्या सुरू आहे. नगर जिल्ह्यात पारनेर मधून सुजित झावरे, अकोल्यातून सुनीता भांगरे तर नगर मधून माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या पवारांच्या सोबतच्या गाठीभेटी झाल्या आहेत. शरद पवारांच्या अकोले या आवडत्या मतदारसंघात ते कोणती रणनीती अवलंबतात याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या भूकंपानंतर आमदार लहामटे अजित पवार यांच्या सोबत महायुतीत गेल्याने 2024 विधानसभेसाठी पवारांकडून नव्या शिलेदाराची निश्चितपणे चाचपणी सुरू असणार आहे. यासंदर्भात माजी आमदार वैभव पिचड ( Vaibhav Pichad ) सरकारनामाने ( Sarkarnama ) बोलतांना म्हणाले, 'आम्ही पवारसाहेबांसोबत बोलूनच पक्षा बाहेर पडलो, तेंव्हा पासून, ना त्यांनी आम्हांला संपर्क केला, ना आम्ही केला. जर साहेबांकडून संपर्क केला तर आम्ही नाही कसे म्हणणार, फोनवर बोलणारच,' असे त्यांनी बोलताना स्पष्ट केले.

'आम्ही मतदारसंघाच्या विकासासाठी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळेच आमदार किरण लहामटे नाही- नाही म्हणत अजित पवार ( Ajit Pawar ) गटात सामील झाले. आपण भाजपसोबतच असल्याचेही त्यांनी सांगितले. मतदारसंघात त्यांनी मागितलेल्या कामांना निधी मिळाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अडीच वर्षे सत्तेत असताना लहामटे ( Kiran Lahamate ) यांना कळून चुकले की तालुक्यातील कामे मार्गी लावण्यासाठी निधीची आवश्यकता असते. त्यामुळेच लहामटे आता अजितदादांसोबत आल्याचे पिचड म्हणाले'.

अकोले मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून 2014 वगळता राष्ट्रवादी पक्षासोबत आहे. 2009 पर्यंत जेष्ठनेते मधुकरराव पिचड हे सातत्याने येथून निवडून आले. 2014 ला पिचड पिता-पुत्र भाजप मध्ये गेले. भाजप लाटेमुळे वैभव पिचड हे पहिल्याच निवडणुकीत विजयी झाले. मात्र, 2019 ला शरद पवारांचा करिश्मा अकोले मतदारसंघात पुन्हा दिसून आला आमि राष्ट्रवादीच्या डॉ.किरण लहामटे यांनी वैभव पिचडांचा पराभव केला.

विधानसभा उमेदवारी बद्दल काय असा प्रश्न वैभव पिचड यांना विचारला तेव्हा, 'जो प्रश्न सध्या आज समोर नाही, त्या गोष्टीत जाण्यात अर्थ नाही. मधल्या काळात लोकसभा निवडणुका तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. पक्षाने आम्हांला भिवंडीच्या शिबिरात 152 प्लस आमदार निवडून आणायचे आहेत, कामाला लागा, असे आदेश दिले आहेत. त्यादृष्टीने आम्ही कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी पाहता येईल, असे सूचक वक्तव्य केले पिचड यांनी केले आहे.

Edited By : Rashmi Mane

SCROLL FOR NEXT