Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

हिंमत असेल तर जयंत पाटलांशिवाय निवडणूक लढवा आणि जिंकून दाखवा!

सरकारनामा ब्यूरो

इस्लामपूर (जि. सांगली) : हिंमत असेल तर पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याशिवाय निवडणूक लढवा आणि जिंकून दाखवा, असे आव्हान इस्लामपूर येथील विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नगरसेवकांना पत्रकार परिषद घेऊन दिले. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दिलेले आव्हान आम्ही स्वीकारत असून, त्यांनी तारीख, वार, वेळ निश्चित करावी. गांधी चौकात स्टेजवर यावे. आम्ही आणलेल्या निधीचा हिशेब जनतेसमोर देऊ, असेही ते म्हणाले. (Vikas Aghadi's Vikram Patil challenge to NCP corporators)

विक्रम पाटील म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना शहराच्या विकासाशी काहीही देणेघेणे नाही. त्यांनी सत्ताकाळात फक्त स्वतःची मालमत्ता, व्यवसाय, उद्योगधंदे वाढवले. राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता असताना राष्ट्रवादीचे गटनेते असल्याचा विसर संजय कोरे यांना पडला होता. ते नेहमी नगराध्यक्षांच्या जवळ राहून नगराध्यक्षांनी चांगले काम केले आहे असे सांगत होते. संजय कोरे, शहाजी पाटील, दादासाहेब पाटील व खंडेराव जाधव यांनी आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दिलेले आव्हान आम्ही स्वीकारतो. राष्ट्रवादीच्या गेल्या ३० वर्षांच्या सत्ताकाळामध्ये जेवढा निधी आला नाही, तेवढा निधी आम्ही ५ वर्षांच्या काळामध्ये आलेला आहे.’’

‘‘संजय कोरे स्वतःच्या प्रभागाचा विकास करू शकले नाहीत. त्यांना शहराच्या विकासाच्या बाबतीत बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीमधून निधी मिळण्यासाठी आम्ही तातडीने सभा घेतली. पण, व्हिडीओ शुटींगचा आग्रह करून त्यांनीच तो विषय प्रलंबित ठेवला. आमच्या ५ वर्षांत १२३ कोटी ३७ लाख ३३ हजार ५८७ रूपये निधी आम्ही आणला. त्यांच्या ३० वर्षांच्या कारकिर्दीत १७९ कोटी ५३ लाख ९७ हजार रूपये एवढा निधी आणला. अनेक ठराव बेकायदेशीर झाल्याचा आरोप खंडेराव जाधव यांनी केला. हे ठराव होताना राष्ट्रवादी सभागृहामध्ये काय करीत होती, त्यांनी विरोध का केला नाही. उलट शिवसेनेने आणलेल्या ११ कोटी निधीला विरोध करत ३ वेळा सभेला गैरहजर राहून विकासकामाला खिळ घातली. मुख्याधिकाऱ्यांना हाताशी धरून चालू भुयारी गटरचे काम थांबवले. राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक अकार्यक्षम असून ते शहराचा विकास करू शकत नाहीत."

आनंदराव पवार म्हणाले, ‘‘संजय कोरे यांना नगराध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीचा विसर पडलेला असावा. आम्ही भुयारी गटाराची कामे थांबवली नाहीत. ऐन उन्हाळ्यात पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात होते. ठेकेदाराने अगोदर दुरुस्ती करावी आणि मगच काम सुरू करावे, यासाठी त्यावेळी काम थांबवले होते. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी असे बिनबुडाचे आरोप बंद करावेत. शिवसेना-विकास आघाडीने गेल्या पाच वर्षांत प्रामाणिक काम केल्यामुळे येत्या निवडणुकीत आम्ही जिंकू आणि सत्तेत येऊ.’’ शिवसेनेचे आनंदराव पवार, वैभव पवार, शकील सय्यद, प्रदीप लोहार, शिंगण या वेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT