Vitthal Sugar Factory And Chairman  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vitthal Sugar Factory : विठ्ठल कारखाना अन्‌ सत्ताधारी...; अभिजित पाटलांनी औदुंबरअण्णांपासून भालकेंपर्यंतचा इतिहासच सांगितला

Vijaykumar Dudhale

Solapur, 05 May : विठ्ठल सहकारी साखर कारखाना आणि सत्ताधारी पक्ष यांच्यातील नाते सांगत आपण भारतीय जनता पक्षासोबत जाऊन चुकीचे करत नाही, असे सांगण्याचा प्रयत्न कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी केला. कारखान्याचे संस्थापक औदुंबर अण्णा पाटील, वसंतराव काळे आणि भारत भालके यांनीही कारखान्यासाठी सत्ताधारी पक्षाशी कसे जुळवून घेतले होते, हे सांगण्याचा प्रयत्न पाटील यांनी आपल्या भाषणातून केला.

माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार अनुक्रमे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राम सातपुते यांच्या प्रचारार्थ विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन केले होते. त्या सभेत अभिजित पाटील (Abhijeet Patil) बोलत होते. विठ्ठल कारखाना हा आम्हा सर्वांचा आस्थेचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. विठ्ठल कारखान्याला (Vitthal Sugar Factory) फडणवीसांची जी मोलाची साथ मिळाली, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, असे त्यांनी सुरुवातीलाच सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ते म्हणाले, औदुंबरअण्णांच्या काळातही काँग्रेसचे दोन भाग झाले होते. त्या वेळी अण्णांनी सत्तेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता. (स्व.) वसंतराव काळे हे विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष झाले, त्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते. मात्र, मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनीही सत्तेसोबत जाऊन विठ्ठल कारखान्याचा विस्तार केला आणि चंद्रभागा कारखान्याची निर्मिती केली.

ते म्हणाले, भारतनाना भालके भाजप, शिवसेनेत होते. पुढच्या काळात आर. आर. पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत गेले. त्यामुळे सत्तेशिवाय कारखान्याला मदत होऊ शकत नाही. मी या सर्व नेत्यांप्रमाणे सत्तेची मदत मागायला गेलो. एका आमच्या सहकाऱ्याने तर सांगितले की, तुम्ही भाजप, एमआयएम, वंचित कुठंही जावा; पण साखर कारखान्याचे कुलूप उघडलं पाहिजे.

औदुंबरअण्णा पाटील यांनी उभारलेल्या या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा सभासद आहे, म्हटल्यावर मुलगी दिली जायची. एवढं क्रेडीट या कारखान्याचं होतं. पण, कारखान्यावर जप्तीची नामुष्की आली, ही आमच्या सर्वांसाठी खंत होती. मागील संचालक मंडळाचा गलथान कारभार, तसेच, कारखाना बंद असताना २१६ कोटी रुपये कर्ज मिळाले. पण त्यातून नटही बदलेला नाही आणि पाच-पाच कोटी रुपये विड्राल केले आहेत. भ्रष्टाचार करून कारखान्याला ओरबडून खाण्याचे काम केले; म्हणून कारखाना अडचणीत आला. त्यामुळे तो बंद पडला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ३० ते ३५ कोटी रुपये थकवून चेअरमन नॉट रिचेबल होऊन पळून गेला, असा हल्लाबोल पाटील यांनी मागील संचालक मंडळावर केला.

अभिजित पाटील म्हणाले, विठ्ठल साखर कारखान्याच्या निवडणुकीत आम्ही पॅनेल उभा करण्यासंदर्भात चर्चा करत होते. कारण, २००७ मध्ये या विठ्ठल साखर कारखान्यावर आम्ही ट्रॅक्टर आणि टोळी घेऊन होतो. त्यामुळे कारखान्याची निवडणूक लढविण्याचे मोठे स्वप्न पाहत होतो. निवडणुकीत तीन पॅनेल होते, त्यात भालके, अभिजित पाटील आणि युवराज पाटील यांच्या पॅनेलाचा समावेश होता. पण मी कारखान्यात मोळी टाकण्याच्या आतमध्ये पैसे देण्याचे आश्वासन दिले होते, कारखाना फायद्यात कसा येऊ शकतो, हा शब्द मी सभासदांना दिला होता. माझ्या घरात साधा ग्रामपंचायत सदस्यसुद्धा नव्हता. पण सभासदांनी आमचे पॅनेल सरासरी २२०० मतांनी निवडून दिले.

मी सगळ्या पक्षाच्या नेत्यांना भेटत होतो. अगदी देवेंद्र फडणवीस यांनाही भेटायचो. मात्र, मध्यंतरी काही गोष्टी घडल्या. काही लोक म्हणतात की भाजपने कारवाई केली आणि भाजपनंच सोडवलं. पण, कारखान्यावर २०२१ मध्येही जप्तीची कारवाई झाली होती. त्यावेळी दोन शेतकऱ्यांनी न्यायालयात जाऊन स्थगिती मिळविली होती. ती स्थगिती नेमकी कारखाना चालू असताना उठली. मी उपमुख्यमंत्री अजितदादांना भेटलो, सहकार मंत्र्यांना भेटलो. शहाजीबापूंच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे जाण्याचा प्रयत्न होता. मात्र कुठेच मार्ग निघत नव्हता, न्यायालयाची बाजू हेाती, असेही पाटील यांनी नमूद केले.

अभिजित पाटील म्हणाले, लोकसभेची निवडणूक असताना कारवाई कशी झाली, अशी चर्चा आहे. कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असल्यामुळे आम्ही कारवाईला स्थगिती मागत होती. त्यानुसार मिळाली. मात्र, कारखान्याचा गळीत हंगाम १० एप्रिलला संपला. त्यानंतर बॅंकेने कोर्टात म्हणणं मांडलं आणि कोर्टानेही कारवाईवरील स्थगिती उठवली. आम्ही २०२१ ते २०२४ ढकलत आणलं होतं. पण कारखान्यावर कारवाई झाली.

अभिजित पाटलांनी पुढच्या हंगामाचा ऊसदर जाहीर केला

आज आपण तीन हजार रुपये भाव दिला आहे. पण, पुढच्या वर्षी मी ३५०० रुपये भाव द्यायचा आहे. सरकार म्हणून तुम्ही आमच्या पाठीशी राहिलात, तर आम्ही पुढच्या हंगामात नक्कीच ३५०० रुपये भाव देऊ शकतो. मी एकटाच नाही, तर माझ्यासोबतच सर्व सहकारी आपल्यासोबत असणार आहेत. आपण दिलेला शब्द पाळून आम्हाला मदत कराल, अशी अपेक्षा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT