MP Udayanraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Udayanraje Bhosale : केंद्रीय कर्मचाऱ्यांना शिवजयंतीची ऐच्छिक सुटी; खासदार उदयनराजेंनी मानले जितेंद्र सिंह यांचे आभार

Umesh Bambare-Patil

Satara News : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी केंद्रीय कर्मचाऱ्यांना ऐच्छिक सुटी उपलब्ध केल्याबद्दल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे मंत्री जितेंद्र सिंह यांचे आभार मानले.

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोन दिवस ऐच्छिक सुट्या (रिस्ट्रिक्टेड हॉलिडे) घेता येतात. महाराष्ट्राबाहेर कार्यरत असलेल्या मराठी कर्मचाऱ्यांना शिवजयंती साजरी करता यावी म्हणून या यादीत शिवजयंतीच्या सुटीचा समावेश करावा, अशी मराठी जनतेची मागणी होती. ती मान्य करून केंद्र सरकारने (Chhatrapati Shivaji Maharaj) आपल्या कर्मचाऱ्यांच्या ऐच्छिक सुटीच्या यादीत १९ फेब्रुवारीचा समावेश केला आहे.

या यादीत या दिवसाचा उल्लेख चुकून ‘शिवाजी जयंती’ असा झाला असून, त्याऐवजी ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ असा उल्लेख करण्यात यावा, अशी मागणी खासदार उदयनराजे (Udayanraje) यांनी केली. मंत्री महोदयांनी ती मान्य केली.

काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारच्या स्वदेश योजनेअंतर्गत बुद्ध सर्किट, रामायण सर्किट अशी सर्किट पर्यटकांसाठी विकसित केली जात आहेत. याच धर्तीवर ‘शिव स्वराज्य सर्किट’ विकसित करण्यात यावे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर, पाचगणी व कास पठारासह अनेक पर्यटनस्थळे असून, त्यांचा प्रचार आणि प्रसिद्धी केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्वत्र व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसे झाल्यास जास्तीत जास्त पर्यटक सातारा जिल्ह्यात येतील आणि स्थानिकांना रोजगार मिळेल. तसेच सातारा जिल्ह्यात केंद्र शासनाच्या वतीने टूरिजम नॅशनल कॉन्क्लेव्ह आयोजित करून स्थानिक पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी खासदार उदयनराजेंनी केली.

या सर्व मागण्यांना जी. किशन रेड्डी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, त्या भागातील पर्यटनवाढीसाठी तुम्ही जे प्रयत्न कराल त्यास केंद्र शासनाचे कायम सहकार्य राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.

दरम्यान, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची जबाबदारीही जितेंद्र सिंह यांच्याकडे असल्यामुळे त्या विभागाशी संबंधित अनेक विषयांवर या भेटीत चर्चा झाली. कऱ्हाड तालुक्यातील हजारमाची येथे ६०० कोटी रुपये खर्चून भूकंप संशोधन केंद्र आणि भूकंप अभ्यासाचे विद्यापीठ उभारण्यात येत आहे. हा मुद्दाही या भेटीत सविस्तर चर्चिला गेला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT