Annasaheb Dange News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhangar Reservation News : 'आरक्षण देईल त्याच पक्षाला मतदान करा' ; अण्णासाहेब डांगेंचं धनगर समाजाला आवाहन!

Anil Kadam

Annasaheb Dange appeal to Dhangar society : धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत न्यायालयाने दिलेला निकाल दुर्दैवी आहे. या निकालामुळे धनगर समाजाचे भवितव्य अंध:कारमय होणार आहे. आता केंद्र शासनाने कायदा करूनच धनगर समाजाला आरक्षण द्यावे. केंद्रात भाजपचीच सत्ता येणार आहे. राज्यातही भाजपाच्याच पुढाकाराने सरकार सत्तेवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जो पक्ष, जो नेता आरक्षण देईल त्यांनाच धनगर समाजाने मतदान करावे. असे आवाहन माजी मंत्री व धनगर समाजाचे नेते अण्णासाहेब डांगे यांनी केले.

याशिवाय ते पुढे म्हणाले, न्यायालयाने धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात असणाऱ्या सर्व याचिका फेटाळल्या आहेत. न्यायालयाच्या या निर्णयाने धनगर समाजाचे अधःपतन अधिक वाढेल. मेंढपाळाचा व्यवसाय बंद केल्याने धनगर समाजाचे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. आज अनेक समाजबांधव मुंबईत गोदीत काम करून झोपडपट्टीत राहत आहेत. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही धनगर समाजाचे प्रश्न मार्गी लागले नाहीत. धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांनीही यासाठी फारसे प्रयत्न केले नसल्याचे सांगत समाजाच्या आमदारांवर टीकास्त्र सोडले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धनगर समाजाच्या नावावर राज्यातील अनेक नेत्यांनी आमदारकी मिळवली हे आमदारकीच्या कालावधीत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची गरज होती. मात्र तसे काहीच झाले नाही. राज्याच्या सभागृहात काही आमदारांनी एवढ्या वर्षात केवळ 13 वेळाच हा प्रश्न उपस्थित केला गेला, तोही चुकीच्या पध्दतीने मांडला आहे. त्यामुळे धनगर आरक्षणाला गती मिळाली नाही. ज्यांनी पदे मिळवली, त्यांनी समाजापेक्षा स्वहिताला महत्व दिले.

त्यामुळे समाजाचा प्रश्न जटील बनला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपाचे सरकार येईल, असे दिसत आहे. मात्र येणाऱ्या निवडणुकीत जो पक्ष धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देईल त्यालाच मतदान करावे. असे आवाहन माजी मंत्री डांगे यांनी केले.

2014 मध्ये राष्ट्रवादीचे पक्ष अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पुढाकार घेतला होता. मात्र काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने पवारांचे खच्चीकरण करण्यासाठी धनगर समाजातील काही नेत्यांना हाताशी धरून बारामतीत आंदोलन करायला लावले. तेव्हापासून पवार यांनी या प्रश्नातून लक्ष काढले.

या आंदोलनावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचा मुख्यमंत्री करा, मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीतच हा प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन दिले. त्यानंतर भाजपची सत्ता आली, आजही आहे. परंतु, आरक्षणाचा प्रश्न काही सुटला नाही, असेही त्यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT