Shahaji Patil -Eknath Shinde
Shahaji Patil -Eknath Shinde  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

एकनाथ शिंदे बंडाला तयार नव्हते...पण ४० आमदारांनी त्यांना ४ महिने `टाॅर्चर’ केले अन्‌ इतिहास घडला..

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे (Shivsena) आमदार फोडले. त्यांनी असं केलं, तसं केलं, हे सर्व खोटं आहे. उलट आम्हीच एकनाथ शिंदे यांना घेऊन गेलो. आम्ही ४० ते ४२ आमदारांनी तब्बल चार महिने टॉर्चर करून करून एकनाथ शिंदे यांना या निर्णयापर्यंत आणले होते, असा सांगून बंडखोरांचा कट चार महिन्यांपासूनच शिवसेनेत शिजत होता, हे शिवसेनेचे सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील (ShahajiBapu Patil) यांनी उघड केले. (We 40 to 42 MLAs prepared Eknath Shinde to revolt : Shahaji Bapu Patil)

एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शहाजीबापू पाटील यांनी वरील गोष्ट उघड केली. एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या विरोधात बंड करायला तयार नव्हते. उलट आम्ही आमदारांनीच त्यांनी बंडाची भूमिका घ्यायला लावली, असा प्रत्यक्षपणे आमदार पाटील यांनी सूचित केले आहे.

शिवसेना ताब्यात घेण्याबाबतच्या वादावरही आमदार पाटील यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, आज महाराष्ट्रात चालेला वाद दुर्दैवी आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर बाकीच्या गोष्टी या निरर्थक आणि वेळकाढूपणाच्या आहेत. वसंतदादा, अंतुले, शंकरराव चव्हाण, सुधाकर नाईकांच्याविरोधत बंड झाले तरी ते कधी कुठल्या न्यायालयात गेले नाहीत. मग यांना खुर्ची गेल्यानंतर कोर्टकचेऱ्या काय आठवायला लागल्या. त्यातून हे प्रकरण वाढत चालेले आहे. शिवसेना ही आमचीच आहे. कारण, चाळीस आमदार, बारा ते तेरा खासदार, जनता आमच्या बाजूने आहे. हे म्हणाले रस्त्यावर लढा, कुठे जाळपोळ झाली. उलटपक्षी एकनाथ शिंदे यांचे जनतेने मोठ्या प्रमाणात स्वागत केले आहे.

शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची एकनाथ शिंदे गाठीभेटी घेत आहेत. त्यावर पाटील म्हणाले की, ज्या लोकांनी काबाडकष्ट करून शिवसेना वाढवली, त्या लोकांमुळे ५६ वर्षांत शिवसेनेची वाढ होत गेली. शिवसेनेच्या चार जणांनी आतापर्यंत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. हा इतिहास आहे, त्यामुळे ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केले आहे. अशा लोकांची भेट घेऊन आशीर्वाद घेणे आणि यापुढे शिवसेना कशी चालवावी, यासाठी कदचित शिंदे हे ह्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करत असतील.

बाळासाहेब ठाकरे यांचे नाव न वापरण्याच्या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा शहाजी पाटील यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दुसऱ्या पक्षाला, व्यक्तीला घेता येणार नाही, असा एक ठराव आम्ही गुवाहाटीत असताना मंजूर झाला. हा या लोकशाहीच्या इतिहासातील ७५ वर्षांतील सर्वांत मोठा विनोद आहे. बाळासाहेब ठाकरे हे उत्तुंग व्यक्तीमत्व आहे, त्यामुळे इतरांनी त्यांचे नाव घ्यायचं नाही, असे कोणालाही म्हणता येणार नाही. मला बाळासाहेबांच्या नाव घ्यायचे असेल तर उद्धव ठाकरेंची परवानगी घ्यायची का. हा काय पोरखेळ चालला आहे. ही नुसत पोरटकी आहे. हे फक्त संजय राऊतांच्या म्हणण्यावर चाललं आहे.

शिवसेनेच्या स्थापनेदिवशी तुम्ही शिवाजी महाराजांचा फोटो लावला, त्याबाबत सातारच्या राजांनी शिवाजी महाराजांचा फोटो का लावला म्हणून विचारलं का. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी विचारलं का, की शिवाजी महाराजांचा फोटो का लावला म्हणून. जसं छत्रपती सर्वांचे आहेत, तसे हिंदूहृदयसम्राटही सर्वांचे आहेत. हा सर्व प्रकार हसण्यासारखा आहे. हिंदूहृदयसम्राटांचं नाव घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, तो कोणीही अडवू शकत नाही. आमची तर शिवसेना आहे, आमचा पक्ष हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. त्यामुळे त्यांचे नाव घेणार आणि व्यासपीठावर फोटो लावणारच आहोत. प्रत्येक भाषणात ज्यांचा जयजकार करणार आहोत. आम्हाला कोणी अडवू शकत नाही. अडवायचं असेल तर आमच्यावर कायदेशीर गुन्हा नोंद करा, असेखुले आव्हान शहाजी पाटील यांनी उद्वव ठाकरे यांना दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT