Shrirang Barne
Shrirang Barne Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

पूर्वीच्या सरकारमध्ये एकट्या भाजपचा त्रास होता; आता दोघांकडून होतोय : शिवसेना नेत्याची कबुली

राजकुमार शहा

मोहोळ (जि. सोलापूर) : शिवसेना (shivsena) हा इतरांपेक्षा वेगळा पक्ष आहे, तो एक परिवारच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे काम चांगले आहे, यापूर्वीच्या सत्तेत असताना भाजपचा (BJP) एकट्याचाच त्रास होता, पण आता दोन पक्षांचा (काँग्रेस Congress-राष्ट्रवादी NCP) त्रास आपल्याला सहन करावा लागतो आहे. आपला पालकमंत्री नसेल तर दुजाभावाची वागणूक मिळते, हे सत्यच आहे; तरीही आत्मविश्वासाने काम केले तर आपण यशस्वी होऊ शकतो, असे प्रतिपादन मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी केले. (We are being harassed by Congress-NCP: Shrirang Barne)

मोहोळ येथे शिवसेनेच्या वतीने येथे आयोजित करण्यात आलेल्या व शिवसंपर्क अभियान टप्पा क्रमांक दोन या पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. खासदार बारणे म्हणाले, मोहोळ तालुक्यात अतिशय संघर्षातून शिवसैनिकांनी काम केले आहे, याची नोंद पक्षाकडे असतेच. ग्रामीण भागात काम करताना प्रचंड अडचणी येतात, याची जाणीव आम्हाला आहे. मी जरी खासदार झालो असलो तरी मीही नगरसेवकाप्रमाणेच काम करतो. येथील शिवसैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मी यापुढे लागेल ते सहकार्य करेन, असा शब्द बारणे यांनी मोहोळच्या शिवसैनिकांना दिला.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दीपक गायकवाड म्हणाले की, मोहोळमध्ये तक्रारीचा सूर नाही; परंतु पूर्वीप्रमाणे शिवसेना भवनमध्ये सर्वसामान्यांच्या कामांचे संकलन करून सरकारकडून कामे करून दिली पाहिजेत. संपर्कमंत्री व संपर्कप्रमुख यांनी महिन्यातून दोनदा संपर्क ठेवला पाहिजे. संघटना जिवंत आहे, फक्त वरिष्ठांनी ताकद दिली पाहिजे. फक्त सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात सर्व माजी जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख अशा पदाधिकाऱ्यांच्या कामाचा अनुभवाचा फायदा करून घेतला पाहिजे. मनोहर जोशी यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात भीमा-सीना जोड कालवा झाला तर जिल्ह्यातील सीना भीमा या नद्यांवर बंधारे बांधण्याचे काम आता केले पाहिजे.

यावेळी शिवसेनेचे युवा नेते सोमेश क्षीरसागर यांनी उजनीच्या पाण्याचा निर्णय रद्द करावा, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत लोकप्रतिनिधी, अधिकारी यांची बैठक आयोजीत करुन निर्णय घ्यावा, अशा आशयाचे निवेदन खा बारणे यांना दिले. या वेळी सोलापूर विभागाचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी संघटनात्मक कामांचा आढावा घेताना येणाऱ्या अडचणी निरीक्षकांसमोर मांडल्या. पालकमंत्री अन्याय करतात, त्यासाठी शिवसेनेचे संपर्कमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची नेमणूक करावी, अशी मागणी त्यांनी केली.

या वेळी व्यासपीठावर सोलापूर जिल्हाप्रमुख गणेश वानकर, पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, माजी जिल्हाप्रमुख दीपक गायकवाड, मोहोळ तालुका प्रमुख अशोक भोसले, जिल्हा उपप्रमुख दादा पवार, युवा सेना जिल्हाप्रमुख महेश देशमुख, शिवसेनेचे युवा नेते सोमेश क्षीरसागर, मोहोळ शहर प्रमुख विक्रम देशमुख, माजी नगरसेविका सीमा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनिता सोनार, संगीता टेकाळे, महिला आघाडी तालुका प्रमुख ज्योती नागणे, मोहोळ तालुका शिवसेना संघटक संजय देशमुख, पंढरपूर तालुकाप्रमुख महावीर देशमुख, माजी नगरसेवक सत्यवान देशमुख, वाहतूक सेना प्रमुख सोमनाथ पवार आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT