Solapur, 08 August : मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रांच्या वैधतेवरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. जात प्रमाणपत्रांची व्हॅलिडिटी रद्द केल्याने केवळ गरीब मराठ्यांचेच नव्हे, तर भाजप, शिवसेना आणि काँग्रेससह सर्वच पक्षांतील मराठा समाजाचे नुकसान होत असल्याचा दावा जरांगे यांनी केला. यावेळी त्यांनी काही कागदपत्रे कॅमेऱ्यासमोर दाखवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट सवाल केले.
सोलापुरात माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठा-कुणबी जात प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी रद्द करण्यात आली आहे. यामुळे समाजातील अनेक कुटुंबांचे नुकसान होत आहे. "दाखले रद्द करण्यात नुकसान सर्वांचं आहे. यामध्ये फक्त गरीब मराठ्यांचं नुकसान नाही, तर भाजप, शिवसेना, काँग्रेस पक्षातील सर्वच मराठ्यांचं नुकसान आहे," असे त्यांनी म्हटले.
मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र अवैध का ठरवण्यात आले, याचे उत्तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी द्यावे, अशी मागणी जरांगे यांनी केली. मराठा समाजाच्या मुला-बाळांसाठी आपण लढत असून, या प्रश्नावर सरकारने भूमिका स्पष्ट करावी, असेही त्यांनी म्हटले. "मी काय चुकीचं बोललो? भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मराठ्यांनी माझी चूक सांगावी," असे आव्हानही जरांगे यांनी दिले.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दाखले रद्द करण्यासंदर्भात पत्र दिल्याचा दावा करत जरांगे यांनी फडणवीसांना सवाल केला. "मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पत्र देऊन दाखले रद्द करा म्हणत आहेत, हे फडणवीस साहेबांना कळत नाही का?" असा सवाल त्यांनी केला. तसेच मंत्री संजय शिरसाट यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यास सांगितल्याचा दावाही जरांगे यांनी केला. "संजय शिरसाटांनी फोन करून कुणबी प्रमाणपत्र रद्द करायला सांगितलं, यात मी चुकीचं काय बोललो?" असे ते म्हणाले.
कुणबी प्रमाणपत्राच्या वैधतेच्या मुद्द्यावर बोलताना जरांगे यांनी घोडके नावाच्या व्यक्तीचे उदाहरण दिले. घोडके यांची व्हॅलिडिटी झाली, मात्र त्यांच्या बहिणीची व्हॅलिडिटी रद्द करण्यात आली, असा दावा त्यांनी केला.
यावेळी जरांगे यांनी संबंधित कागदपत्रे कॅमेऱ्यासमोर दाखवत प्रमाणपत्रांच्या पडताळणी प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. "घोडके नावाच्या व्यक्तीची व्हॅलिडिटी झाली आणि त्यांच्या बहिणीची रद्द झाली, यात मी चुकीचं काय बोललो?" असा सवाल त्यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. गेल्या वर्षभरात आपण फडणवीस यांच्याबद्दल कोणतेही चुकीचे वक्तव्य केले नसल्याचे त्यांनी सांगितले.
"फडणवीस साहेबांना मागच्या एक वर्षात मी काहीही चुकीचं बोललो नाही. कारण आम्हाला आशा होती की फडणवीस साहेब आता मराठ्यांचं चांगलं करायला लागले आहेत. मी एका शब्दानेही त्यांना दुखावलं नाही. आता त्यांना बोलायला काय जागा आहे?" असा सवाल जरांगे यांनी केला.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने घेतलेल्या निर्णयांवरून जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतल्याने हा मुद्दा आगामी काळात आणखी तापण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.