Solapur, 06 September : सांगोल्याच्या राजकारणाची कूस दिवसागणिक बदलताना दिसत आहे. एकमेकांचे कट्टर मित्र आज कट्टर विरोधक म्हणून पुढे येत आहेत, तर कालचे विरोधक आज राजकीय मित्र म्हणून एकमेकांच्या गळ्यात गळे घालताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या कानात बोलणारे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी युवा सेनेच्या मेळाव्यात साळुंखेंवर शेलक्या शब्दांत हल्ला चढवला. विधानसभा निवडणुकीत साळुंखेंमुळे झालेला पराभव शहाजीबापू अजून विसरू शकले नसल्याचे दिसून येते.
मागील आठवड्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगोल्याचे दोन माजी आमदार शहाजीबापू पाटील आणि दीपक साळुंखे हे दोघे एकत्र आले होते. त्या वेळी दोघांमध्ये झालेला संवाद, विशेषतः शहाजीबापूंनी दीपक साळुंखे यांच्या कानात केलेल्या कानगोष्टी चर्चेच्या ठरल्या होत्या.
त्या कार्यक्रमातील संवादामुळे मागील २०१९ च्या निवडणुकीत एकाच व्यासपीठावर दिसलेले हे दोन मित्र पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सांगोल्याच्या राजकारणात रंगली होती. त्या निवडणुकीत दीपक साळुंखे यांनी शेतकरी कामगार पक्षाशी असलेली युती तोडून शहाजीबापू पाटील यांना मदत करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णायक मदतीच्या जोरावर शहाजीबापूंनी विधानसभेचे मैदान मारले होते. मात्र त्यावेळी झालेल्या चर्चेनुसार शब्द न पाळला गेल्यामुळे साळुंखे यांनी शहाजीबापूंची २०२४ च्या निवडणुकीत साथ सोडली होती.
विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत माजी आमदार दीपक साळुंखे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून, शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेकडून, तर डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यात निवडणुकीत दीपक साळुंखे आणि शहाजीबापू यांच्यातील मतविभागणीचा फायदा डॉ. देशमुख यांना झाला. दीपक साळुंखेंमुळे विधानसभेला आपला पराभव झाला, ही सल शहाजीबापू पाटील यांच्या मनात आजही कायम आहे, तोच राग पुन्हा एकदा मेळाव्याच्या व्यासपीठावरून निघाल्याचे दिसून येते.
शहाजीबापू यांनी आपल्याच एकेकाळच्या मित्रावर विश्वासघातकी, सूर्याजी पिसाळ, दिवटा अशा उपमा देत आणि सिझर अन् ब्रुटसची कथा सांगत अत्यंत कठोर शब्दांत टीका केली होती. तत्पूर्वी त्यांनी आपला भाचा अमोल पवार याच्या पराभवासाठी तसेच त्याला जिवे मारण्यासाठी अशोक खरातला आणून जवळे परिसरात पूजा केल्याचाही गौप्यस्फोट केला. त्यातून त्यांनी जवळ्याचे नाव घेत साळुंखे यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी साळुंखे यांच्यावर एकाकी चढवलेल्या हल्ल्याची सांगोल्याच्या राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू आहे.
दोन दिवसांपूर्वी एकत्र येण्याची चर्चा करणारे त्यांचे समर्थक आता एकमेकांना इशारे देऊ लागले आहेत. त्यामुळे शहाजीबापू पाटील आणि दीपक साळुंखे यांच्यातील कटुता मिटणार की पुन्हा दोघांमध्ये अंतर वाढत जाणार याची उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.