Ganpatrao Deshmukah-Devendra Fadnavis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ganpatrao Deshmukh Statue Inauguration : विधीमंडळ आवारात गणपतरावआबांच्या पुतळ्याचे काम का सुरू झाले नाही?; फडणवीसांनी सांगितले कारण...

सरकारनामा ब्यूरो

Solapur News : विधीमंडळाच्या आवारात भाई गणपतराव देशमुख यांचा पुतळा उभारण्याबाबत सर्वांचं एकमत झालं आहे. पण, चर्चा एकाच विषयावर थांबली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोडला तर कुठलाच पुतळा कोणाला दिसत नाही. त्यामुळे सर्वांना दिसेल अशा ठिकाणी आबासाहेबांचे स्मारक उभारण्यात येईल. विधानमंडळात येणाऱ्या आमदाराला त्यांच्याकडून प्रेरणा मिळेल. पण, जे लोक त्यांना ओळखत नाहीत, तेही आबासाहेबांचे कार्यकर्तृत्वातून प्रेरणा घेतील, असे स्मारक विधीमंडळाच्या आवारात उभारण्यात येईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (Why work on statue of Ganapatrao Deshmukh in Legislature premises stopped?: Fadnavis said because...)

सांगोल्यात माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ज्येष्ठ नेते शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज (ता. १३ ऑगस्ट) झाले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, रामराजे निंबाळकर, खासदार संजय पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार बबनराव शिंदे व इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विधीमंडळाच्या आवारात गणपतराव देशमुख यांचा पुतळा उभारण्याबाबतची चर्चा बीएसीमध्ये झाली आहे. सगळ्यांची त्याला मान्यता आहे. पण, केवळ एकाच विषयावर ती चर्चा थांबली आहे. आपल्या विधीमंडळाची भौगोलिक रचना अशी आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोडला, तर कुणाचाच पुतळा कोणालाही दिसत नाही.

महात्मा फुले, यशवंतराव चव्हाण आदी महापुरुषांचे पुतळे त्या ठिकाणी आहेत. मात्र, ती भौगोलिक रचनाच अशी आहे की, त्यामुळे तिथं पुतळा केला तर तो कोणालाच दिसत नाही. गणपतराव देशमुख यांचे स्मारक अथवा पुतळा आपण करणार आहोत. तो सगळ्यांना नीट दिसला पाहिजे. आलेल्या व्यक्तीला प्रेरणा मिळाली पाहिजे. यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष व विधान परिषदेच्या उपाध्यक्षांना मी विनंती केली आहे की, यावर काय उपाय काढता येईल आणि स्मारक कोठे करायचे, याबाबत आपण ज्येष्ठांशी चर्चा करून निर्णय घ्यावा. त्याबाबतचा निर्णय आपण लवकरच करू,असेही फडणवीस यांनी नमूद केले.

आबासाहेबांचं कार्य एवढं मोठं होतं. जो आमदार विधानमंडळात येईल, त्याला आबासाहेबांकडून प्रेरणा मिळाली पाहिजे. जे लोक आबासाहेबांना ओळखत नाहीत. त्यांनीही देशमुख यांचे कार्यकर्तृत्व बघितल्यानंतर त्यातून त्याला प्रेरणा मिळाली पाहिजे. अशा प्रकारचे स्मारक विधीमंडळाच्या आवारात उभारण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

आवाजातील कणखरपणा शेवटपर्यंत कायम होता

त्यांचं शेवटचं अधिवेशन २०१९ मधील होतं. त्यांच्या आजावातील कणखरपणा किंचितही आम्हाला कमी झालेला दिसला नाही. आबासाहेबांना माईकची आवश्यकता नव्हती. ते बोलायला उभे राहिले की संपूर्ण सभागृह बिनामाईकचे दणाणून सोडायचे, असा त्यांचा बुलंद पहाडी आवाज होता. त्यांचे एम्प्रेसिव्हि व्यक्तीमत्व आजही आपल्या डोळ्यासमोर आहे.

ते दुःख आम्हा सर्वांना आहे

आज आबाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने त्यांच्या स्मृतींना पुन्हा उजाळा देण्याची संधी मिळाली, याचे मला समाधान आहे. पण त्याचवेळी या गोष्टीचं दुःखही आहे की, आम्ही नेहमी असं म्हणायचो की आबासाहेब तुम्ही जेव्हा शंभर वर्षांचे व्हाल, त्यावेळी तुमच्या शंभराव्या वाढदिवसाला विधानमंडळात एक मोठा कार्यक्रम करणार आहोत. त्या कार्यक्रमपासून आम्हाला वंचित राहावं लागलं, याबद्दलचं दुःखही आम्हा सर्वांना आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT