Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar Kolhapur Sabha : कोल्हापूरच्या सभेत शरद पवार ‘ते’ संशयाचे धुके दूर करणार का?; मुश्रीफांवरही बोलणे टाळण्याची शक्यता...

सरकारनामा ब्यूरो

Kolhapur Political News: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कोल्हापूर हे एक समीकरण आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून कोल्हापूरकरांनी पवारांवर भरभरून प्रेम केलेले आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवारांची येत्या २५ तारखेला दसरा चौकात जाहीर सभा आहे. पवार आणि कोल्हापूरकरांचे ऋणानुबंध पाहता याही सभेला मोठा प्रतिसाद मिळेल. पण, जनतेच्या मनात पवारांविषयी असलेली संशयाची धुके दूर करणार का, अशी चर्चा कोल्हापूरमध्ये रंगली आहे. (Will Sharad Pawar clear the fog of 'that' doubt in the Kolhapur meeting?)

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजकीय डावपेचाचा आतापर्यंत भल्याभल्यांना अंदाज आलेला नाही. अगदी त्यांचे सहकारीही ‘पवारसाहेब काय निर्णय घेतील, याचा पत्ता लागत नाही,’ असे अनेकदा बोलून दाखवतात. पवारांनी कोणताही निर्णय घेतला तरी त्याकडे संशयाने पाहिले जाते. त्यामुळे आताही अजितदादांच्या बंडांनंतरही हा पवारसाहेबांची ‘गेम’ असे बोलले गेले. पुण्यात एका उद्योजकाच्या घरी झालेल्या भेटीच्या घडामोडींमुळे पुन्हा त्याला खतपाणी मिळत गेले. पण, पवारांनी राजकारण आणि नाते, संबंध वेगळे हे समीकरण पहिल्यापासून जपलेले आहे. एकीकडे इंडिया आघाडीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांना कडाडून विरोध करणारे पवार त्यांच्या लोकमान्य टिळक पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला मात्र आवर्जून उपस्थित होते.

अनेकांचा राजकीय विरोध पत्करून पवारांनी आपले वैयक्तिक संबंध जपले आहेत. मात्र, ते पवारांभोवती संशयाचे धुके निर्माण करीत आहे. मात्र, राजकीय नुकसान सहन करून पवारांनी ते संबंध जपले आहेत. अजित पवारांचा एक गट पक्षातून बाहेर पडल्यानंतरसुद्धा राष्ट्रवादीत दोन गट नाहीत, असे त्यांनी निवडणूक आयोगाला स्पषटपणे सांगितले आहे. तसेच, अजितदादा गटाला वारंवार भेटणे यामुळे पवारांविषयी जनतेच्या मनात संशयाची पाल चुकचूकत आहे.

राज्यभर दौरे करून शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसची पुनर्बांधणी करत आहेत. येवला, बीडनंतर येत्या २५ ऑगस्टला पवारांची त्यांच्या आवडत्या कोल्हापूरमध्ये सभा होत आहे. आता या सभेत पवार आपल्याविषयी असणारा संशय दूर करणार का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

मुश्रीफांवर बोलण्याची शक्यता कमीच

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. मात्र, मुश्रीफांनी पवारांची साथ सोडून अजितदादा गटात सामील झाले आहेत. मुश्रीफ यांचा सर्वसामान्य कार्यकर्ते ते राज्याचे कॅबिनेट मंत्रिपदापर्यंतचा प्रवास पवारांच्या पाठबळावरच झाला आहे. मात्र, मुश्रीफांनी साथ सोडल्याने राष्ट्रवादीचा हा गड कमकुवत झाला आहे. मात्र, बीडचा अनुभव लक्षात घेता पवार हे मुश्रीफांना टार्गेट करण्याची शक्यता कमीच आहे. तसेही सोडून गेलेल्या सहकाऱ्यांवर टीका करणे पवारांनी आतापर्यंत कटाक्षाने पाळले आहे. त्यामुळे पवार मुश्रीफांऐवजी भाजप आणि मोदींवर हल्लाबोल करतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

हिंदुत्वादी मोर्चांवर भाष्य करण्याची शक्यता

पुरोगामी विचारांचा वारसा जपणारे शहर म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी समतेचा संदेश या नगरीतून दिला. छत्रपती राजश्री शाहू महाराज यांना आदर्श मानून काम करणारे म्हणून शरद पवारांची ओळख आहे. अलीकडच्या काळात हिंदुत्ववादी संघटनांनी मोठंमोठे मोर्चे काढून शहराची पुरोगामी ही ओळख पुसण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हाट्स ॲप स्टेटसवरून कोल्हापूर शहरात दंगल उसळली होती.त्यावेळी खुद्द शाहू महाराजांनी नाराजी व्यक्त केली होती. पुरोगामी कोल्हापूरला लागलेला तो एक डाग आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली हेाती. त्यावर पवार आपल्या भाषणातून भाष्य करण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT