Ahmednagar Politics :  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ahmednagar Politics : पालकमंत्री आहात मालकासारखे वागू नका... ; थोरातांचे विखेंना खडे बोल !

राजेंद्र त्रिमुखे

Sangamner News : नगर जिल्ह्यातील आजी-माजी महसूलमंत्र्यांची खडाखडी थांबण्याचे चिन्हे दिसत नाही. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. कधी थोरात विखेंवर तर कधी विखे थोरातांवर तोंडसुख घेताना दिसत असून, हा सिलसिला सध्या थोरातांचा होमपिचवर संगमनेरात होत असल्याने थोरातांनीही विखेंवर खोचक शब्दांत मारा सुरू केला आहे. 'पालकमंत्री आहात मालकासारखे वागू नका,' असे खडे बोल थोरातांनी विखेंना सुनावले. (Latest Marathi News)

संगमनेरमध्ये थोरातांनी बोलावलेल्या तालुका टंचाई बैठकीला प्रांत-तहसीलदार उपस्थित नव्हते. हे अधिकारी पालकमंत्री विखेंनी बोलावलेल्या बैठकीला गेल्यामुळे या वेळी अनुपस्थित होते. त्यामुळे थोरातांनी आपणही महसूलमंत्री राहिलो आहोत, पण असे वागलो नाही, असे म्हणत विखेंवर नाराजी व्यक्त केली. त्याला विखेंनी उत्तर देताना संगमनेरमध्ये सुरू असलेल्या वाढत्या पाणीटंचाईमुळे सुरू करावे लागलेल्या टँकरची आकडेवारी मांडून, तसेच अवैध वाळूउपसा आदी उदाहरणे देत थोरात महसूलमंत्री असताना केलेल्या कामाचे वाभाडे काढले.

आता यामुळे थोरात विखेंवर चांगलेच बरसले असून, संगमनेर तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दहशत करण्यापेक्षा दुष्काळाकडे गांभीर्याने बघा, दहशत करून किंवा धमक्या देऊन संगमनेरचा विकास तुम्ही रोखू शकत नाही. थोडे लक्ष राहता तालुक्यातही घाला. तेथील जनतेला लोकप्रतिनिधी म्हणून आपली अधिक आवश्यकता आहे. पालकमंत्री म्हणून राहा, मालक असल्यासारखे वागू नका, असा हल्लाबोल केला आहे.

'संगमनेरमध्ये येऊन अधिकारी कर्मचाऱ्यांसह विकासकामे पूर्णत्वाकडे नेणाऱ्या कंत्राटदारांना धमक्या दिल्या जातात. संगमनेरचा विकास त्यांना बघवत नसल्याने त्यांचा राग मी समजू शकतो. धाकदपटशा आणि दादागिरी करूनही संगमनेरची जनता वाकायला तयार नाही, त्यामुळे त्यांच्यात वैफल्याची भावना तयार झाली आहे. दुसरीकडे तलाठी भरती, वाळू धोरण याचा पुरता बोजवारा उडाला. लम्पी आजार थांबलेला नाही तो उलट वाढतो आहे. त्यामुळे आपला राग काढायला ते संगमनेरमध्ये येतात. मात्र, येथे येऊन दहशतीची भाषा करणार असाल तर जनता सहन करणार नाही, असे थोरातांनी सुनावले आहे.

निळवंडे धरणातून जेव्हा चाचणी केली तेव्हाच जर अजून महिनाभर पाणी सुरू ठेवले असते, तर संगमनेर तालुक्यात जाणवत असलेली दुष्काळाची दाहकता कमी झाली असती. त्यामुळे संगमनेर सोबतच राहता व कोपरगाव तालुक्यांतील जनतेच्या जीवनातही आनंद निर्माण झाला असता. तोच न बघवल्याने तातडीने पाणी बंद करण्यात आले, असा उपरोधिक टोला लगावला.

दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता निळवंडे च्या डाव्या कालव्याला पाणी सोडावे, या मागणीसाठी संगमनेर, कोपरगाव, राहता आणि राहुरी तालुक्यांतील जनता मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्याच्या आग्रही मागणीसाठी संगमनेरमध्ये आली होती. मात्र, त्यांचा टाहो ऐकण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी महसूलमंत्री विखे पाटील यांच्यावर केली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT