केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान निधी योजना ही देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना मानली जाते. दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये अशा स्वरूपात मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित खर्चासाठी थोडाफार आधार मिळतो. नोव्हेंबर महिन्यात या योजनेचा 21 वा हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. पण या हप्त्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी योजनेतून वगळल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
यवतमाळ जिल्ह्यानंतर आता अमरावती जिल्ह्यातही शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या जिल्ह्यात तब्बल 3 हजार 224 शेतकऱ्यांना योजनेतून बाहेर काढण्यात आले आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, ई-केवायसी आणि आधार पडताळणी पूर्ण न झाल्याने या शेतकऱ्यांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. केंद्र सरकारने 20 व्या हप्त्यानंतर लाभार्थ्यांसाठी काही कठोर नियम लागू केले. त्यापैकी ई-केवायसी पूर्ण करणे हे सर्वात महत्त्वाचे असून, याच प्रक्रियेतील विलंबामुळे मोठ्या संख्येने लाभार्थ्यांचे हप्ते थांबले आहेत.
अमरावती जिल्ह्यातील 2 लाख 69 हजार 974 शेतकऱ्यांच्या खात्यात 21 वा हप्ता जमा झाला असला तरी याचवेळी अनेकांची नावे यादीतून कमी होत गेल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील काही महिन्यांत या जिल्ह्यात 324 शेतकरी कमी झाले असून आता वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांची संख्या एकूण 3,224 वर पोहोचली आहे. काही प्रकरणांमध्ये एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांनी अर्ज केले होते. नियमांनुसार, केवळ एका सदस्याला लाभ मिळू शकतो. त्यामुळे अशा अनेकांच्या नावावरून योजनेचा लाभ हटवण्यात आला.
बँक खात्याशी संबंधित अद्ययावत माहिती, आधार क्रमांकाची जोडणी, तसेच ई-केवायसीची प्रक्रिया वेळेवर न केल्याने अनेक शेतकरी हप्ता मिळण्यापासून वंचित राहतात. विशेष म्हणजे, एकदा हप्ता थांबला तर नंतर प्रक्रिया पूर्ण केली तरी तो मागील हप्ता मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे.
राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे या प्रक्रियेबाबत अधिक स्पष्ट मार्गदर्शन देण्याची मागणी केली आहे. तर तज्ञांच्या मते, तांत्रिक प्रक्रिया सुधारल्यास आणि स्थानिक स्तरावर जनजागृती वाढवली गेल्यास मोठ्या संख्येने शेतकरी पुन्हा या योजनेत सामील होऊ शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.