Prakash Ambedkar
Prakash Ambedkar Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics: पवारांविषयीच्या 'त्या' विधानावर आंबेडकरांचं घूमजाव; राऊतांच्या सल्ल्यालाही केराची टोपली

सरकारनामा ब्यूरो

Prakash Ambedkar News : वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक व अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार हे आजही भाजप सोबतच आहेत असं विधान करुन राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील नेतेमंडळींनी आंबेडकरांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला होता. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनीही आंबेडकरांना महत्वाचा सल्ला दिला होता.

याच पार्श्वभूमीवर शरद पवारांसंबंधीच्या वक्तव्याप्रकरणी प्रकाश आंबेडकरांनी मोठा खुलासा केला आहे.

प्रकाश आंबेडकरांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. आंबेडकर म्हणाले, शरद पवारांसंबंधीचं विधान हे मी भूतकाळातील काही घटना, अनुभवांवरून केलं होतं.. त्याचा सध्याच्या परिस्थितीशी काहीही संबंध नाही. कोणी त्याला चुकीच्या पद्धतीने घेत असेल तर त्याला मी काहीही करू शकत नाही असंही ते यावेळी म्हणाले.

जेव्हा आपण निवडणूक जिंकत नाही असं भाजपाला वाटतं, तेव्हा ते भांडणं लावण्याचं काम करतात. भाजपाला तुम्ही कमी लेखू नका. भाजपा कोणत्याही परिस्थिती कोणत्याही स्थराला जाऊ शकते. भांडण लावणे, मतभेत निर्माण करणे हा त्यांचा फंडा आहे असा हल्लाबोलही आंबेडकरांनी भाजपवर केला.

तसेच कोणताही राजकी पक्ष हा एकमेकांचा शत्रू नसतो. भाजपही आमचा दुश्मन नाही. आमच्यात टोकाचे मतभेद नक्कीच आहे. आणि भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मनुस्मृतीच्या आधारावरील कार्यपध्दतीला आमचा कायमच विरोध राहील.जर समजा त्यांनी त्यांची मनुस्मृतीवर आधारित विचारसरणी सोडली तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करु असंही प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यावेळी म्हणाले.

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रकाश आंबेडकरांच्या शरद पवारांविषयी केलेल्या विधानाशी आम्ही सहमत नाही हे स्पष्ट केलं होतं. पण पवार हे राज्यातच नाही तर देशातलं एक उत्तुंग नेते आहेत. तसेच ते देशात भाजपाविरोधी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न केला जात असताना त्याचे स्तंभ शरद पवार आहेत. सातत्याने या आघाडीसाठी ते प्रयत्न करत आहेत.

महाविकास आघाडीचा (MVA) भाग होण्याची प्रक्रिया सुरु असताना त्याचे स्तंभ शरद पवार यांच्याबद्दल आदर ठेवून बोललं पाहिजे. मतभेद असले तरी त्यांच्याविषयी बोलताना आदर ठेवून बोललं पाहिजे असा सल्लाही आंबेडकरांना दिला आहे.यावर आंबेडकर यांनी एका वाक्यात राऊतांच्या सल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आंबेडकर म्हणाले, मला हा सल्ला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी दिला असता तर तो मी मानला असता असं प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांच्या वक्तव्यानं आंबेडकरांनी राऊतांच्या सल्ल्याला केराची टोपली दाखवल्याची चर्चा सुरु झाली आहे. तसेच महाविकास आघाडीत आम्ही सहभागी झालो तर तिथं कुणा एकाचं नेतृत्व नसेल तर जॉइंट नेतृत्व असेल. तिथे कुणा एकाचं नेतृत्व नसेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT