Prithviraj Chavan Sarkarnama
महाराष्ट्र

Prithviraj Chavan : राहुल गांधींना घेरताच, 'पृथ्वीबाबां'नी सत्ताधाऱ्यांना खडसावलं; समोरासमोर येण्याचं दिलं आव्हान

Pradeep Pendhare

Mumbai News : राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात आरक्षणावर केलेल्या विधानावर देशात आणि राज्यात राहुल गांधी आणि काँग्रेसविरोधात केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांनी गदारोळ सुरू केलाय. राहुल गांधी आणि काँग्रेस घेरत आहेत.

राहुल गांधी यांना विरोधक घेरत असतानाच, राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महायुती भाजपला थेट आव्हान दिलं आहे. 'इथं समोरासमोर चर्चेला या. आमची काय मतं आहे, ती आम्ही मांडू, तुम्ही तुमची मांडा', असं आव्हान पृथ्वीबाबांनी दिलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर असून, त्यांनी तिथं एका कार्यक्रमात भारतातील पक्षपातीपणा थांबेल, तेव्हा भारतातील आरक्षण थांबवण्याचा विचार काँग्रेस करेल. पण भारतात तशी स्थिती नाही, असे विधान केलं होतं. या विधानावरून केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधारी महायुती भाजपने (BJP) काँग्रेस आणि राहुल गांधी यांना घेरण्यास सुरवात केली आहे. भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह, राज्याचे भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका करत इशारा दिला आहे.

राहुल गांधी आणि काँग्रेस (Congress) या मुद्यावर राज्यात बॅकफूटला जात असतानाच राज्यातील काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढं येत, सत्ताधारी महायुतीला खडसावलं आहे. "राहुल गांधींच्या विधानाची मांडणी चुकीची करू नका, समोरासमोर येऊन चर्चा करा. आम्ही आमचे मुद्दे मांडतो, तुम्ही तुमचे मांडा", असं आव्हान पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "राहुल गांधी अमेरिकेत काय बोलले, कुठे बोलले, त्यापेक्षा इथं समोरासमोर चर्चा करू. आमची काय भूमिका आहे, त्यावर मतं मांडू. आमच्या जाहीरनाम्यात देखील आरक्षणावर स्पष्ट भूमिका राहणार आहे. मराठा आरक्षणावर बोलताचं झाल्यास, मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. समाजाची परिस्थिती खूप कठीण आहे". विशेषता, अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतमजुरांची परिस्थिती फारच बिकट आहे. त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. मी मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना पहिल्यादांचा आरक्षण दिल होतं. पण ते टिकलं नाही किंवा टिकवलं नाही, माझ्या सरकारनंतर, येणाऱ्या सरकारने ते काम केलं नाही, हा मुद्दा वेगळाच मुद्दा आहे, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.

पृथ्वीराज चव्हाणांनी 'मविआ'चा विजयी आकडा सांगितला

बेकारीच्या समस्येमुळं मोठं आंदोलन राज्यात उभं राहीलंय. औद्योगिक क्षेत्रामध्ये आपण रोजगार उपलब्ध करू शकलो नाही, म्हणून त्याचा हा परिणाम आहे, असे सांगून यावर कोणत्याही सरकारला कामच करावे लागणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. तसंच लोकसभापेक्षा विधानसभा निवडणुकीत लोकांमध्ये महायुती भाजपविषयी जास्त आणि तीव्र चीट आहे. त्यामुळे महायुतीला 100 देखील जागा गाठता येणार नाही. तुलनेत महाविकास आघाडीला 183 च्यावर जागा मिळताना दिसतात. त्यामुळे सत्तांतर अटळ आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT