Rahul Gandhi Sarkarnama
महाराष्ट्र

MVA News : आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटेना; राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवल्याची चर्चा

Sachin Waghmare

Mumbai News : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. शनिवारी दसरा झाल्यानंतर आता येत्या दोन दिवसात राज्यातील निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षाकडून वेगाने तयारी केली जात आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटत नसताना दिल्लीतून मोठी बातमी पुढे आली आहे.

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासाठी जोरबैठका सुरू आहेत. त्यातच मुख्यमंत्रीपदावरून आघाडीत कोणाच्या नावाची घोषणा झाली नसताना या पदावरून तीन पक्षात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. दरम्यान महाविकास आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपदावरून विशेष करून काँग्रेस (Congress) आणि ठाकरे गटामध्ये चढाओढ सुरु असताना त्यातच आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी राज्यातील मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवल्याची चर्चा जोरात सुरु आहे. (MVA News)

महाविकास आघाडीचे जागावाटप सध्या सुरु आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असल्याची चर्चा असताना पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये जागावाटपात तिढा असल्याचे समजते. त्यासाठी काँग्रेसचे काही नेते दिल्ली दरबारी पोहचले असल्याचे समजते.

दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपदावरून विशेष करून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये चढाओढ सुरु आहे. मुख्यमंत्रीपदावर ठाकरे गटाने गेल्या काही दिवसांपासून आक्रमक पवित्रा घेत अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील आणि सत्ता आल्यास तेच पुन्हा एकदा राज्याची कमान सांभाळतील असे सांगितलं जात आहे.

दसरा मेळाव्यामध्ये संजय राऊत यांनी भाषण केल्यानंतर थेट मुख्यमंत्रीपदावरती दावा केला, तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर घेतलेली शपथ उद्धव ठाकरे यांच्या भाषणादरम्यान दाखवली. त्यामुळे शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाकडून मुख्यमंत्रीपदावर दावा करण्यात आला आहे का? अशी सुद्धा चर्चा रंगली आहे.

त्यातच आता गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदावर निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब दिल्ली दौरा केला होता. यावेळी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची सुद्धा भेट घेतली होती. या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदावर चर्चा झाल्याचा दावा केला जात आहे.

सद्यस्थितीत महाराष्ट्रामध्ये कोणताही निर्णय किंवा बदल करण्याची इच्छा राहूल गांधी यांची नाही. त्यामुळे महाविकास आघाडीची राज्यात सत्ता आल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच असतील असेच राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना सूचित केले असल्याचे समजते.

दुसरीकडे ठाकरे गटाकडून ही बाब जाहीरपणे सांगण्यात यावी आणि मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा, असा आग्रह ठाकरे गटाकडून केला जात आहे. मात्र, काँग्रेसला याला विरोध असल्याचे समजते. त्यामुळे आता ही घोषणा कधी करण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT