Maharashtra politics news : ज्येष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील हे अलीकडे सकल हिंदू समाजाच्या संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून सहभागी झाले आणि भाषणादरम्यान त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी गौरवोद्गार काढले. या प्रकरणात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत, नांगरे पाटील यांनी संविधानाची घेतलेली शपथेची आठवण आणि अखिल भारतीय सेवा नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत सरकारकडे थेट चौकशीची मागणी केली होती.
त्यानंतर आता राज ठाकरे यांनीही या वादात उडी घेत नांगरे पाटील यांच्या ‘दुहेरी निष्ठे’वर जोरदार हल्ला चढवला आहे. याबाबत त्यांनी समाज माध्यमांवर केलेली पोस्ट वेगानं व्हायरल होत आहे.
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, राज्यात होत असलेली हिंदू संमेलने वरकरणी अराजकीय दाखवली जात असली तरी प्रत्यक्षात त्यामागे राजकीय अजेंडा आहे. ही संमेलने कोण आयोजित करत आहे, त्यामागचा हेतू काय आहे आणि पडद्यामागे नेमके कोण आहेत, याचा शोध घेतला तर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, असा सूचक इशारा त्यांनी दिला.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने अशा विचारधारात्मक कार्यक्रमाला उपस्थित राहणे गंभीर बाब असल्याचे सांगताना, अधिकाऱ्यांकडून निष्पक्षता अपेक्षित असते, असे राज ठाकरे म्हणाले. जर संघाविषयी (RSS) इतकीच आपुलकी असेल, तर सरकारी सेवेत राहण्यापेक्षा आयपीएस पदाचा राजीनामा द्या आणि थेट संघ किंवा भाजपमध्ये प्रवेश करा, असा थेट सल्लाच त्यांनी नांगरे पाटील यांना दिला.
नांगरे पाटील यांच्या खाकी वर्दीवर निशाणा साधताना राज ठाकरे म्हणाले, ही वर्दीची खाकी आहे की संघाच्या जुन्या खाकीची निष्ठा? त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनाही लक्ष्य करत, अशा प्रकारची दुहेरी निष्ठा सरकारला चालते का, असा सवाल उपस्थित केला. पुढे चुकीचे पायंडे पडत असताना सत्ताधारी सोयीस्कर मौन बाळगत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
यावेळी राज ठाकरे यांनी 2012 मधील जुना वादग्रस्त मुद्दाही बाहेर काढला. मनसेने मुंबईत रझा अकादमीविरोधात काढलेल्या मोर्चाला पाठिंबा दिल्यामुळे एका पोलिस कर्मचाऱ्यावर तत्कालीन सरकारने निष्पक्षता भंग केल्याच्या आरोपाखाली कारवाई केली होती, याची आठवण करून देत त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, हीच भूमिका सरकार आता विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबत घेणार का?
राज ठाकरे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे महायुती सरकारची नैतिक कोंडी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्याचबरोबर विश्वास नांगरे पाटील यांच्या अडचणीही वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. शेवटी विरोधी पक्षांचे आमदार-खासदार फोडण्याच्या राजकारणावर टीका करत राज ठाकरे म्हणाले, राजकीय पक्षांनंतर जर सरकारी अधिकारीही निष्पक्ष राहिले नाहीत, तर सामान्य जनतेने न्यायासाठी कोणाकडे पाहायचे? त्यांनी नांगरे पाटील यांना थेट इशारा देत, तुमची सद्सद्विवेकबुद्धी कोणत्याही राजकीय पक्ष किंवा संघटनेसाठी गहाण टाकू नका, असा सल्लाही दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.