devendra fadnavis, sunetra pawar, chhagan bhujbal Sarkarnama
महाराष्ट्र

Rajya Sabha Election : छगन भुजबळांच्या राज्यसभेच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम; 'त्या' अटीमुळे वाढली अडचण, 24 तासानंतरही निर्णय होईना !

Rajya Sabha bypoll News : उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला रविवारी रात्रीपर्यंत उमेदवार फायनल करायचा आहे. त्यासाठी गेल्या दोन दिवसापासून राष्ट्र्वादीत मोठ्या घडामोडी दिसत आहेत.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी १८ जूनला मतदान होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला रविवारी रात्रीपर्यंत उमेदवार फायनल करायचा आहे. त्यासाठी गेल्या दोन दिवसापासून राष्ट्र्वादीत मोठ्या घडामोडी दिसत आहेत.

शनिवारी दिवसभर कोअर कमिटीच्या बैठका सुरु आहेत. मात्र, अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार ठरलेला नाही. त्यामुळे उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच दिसत आहे. दुसरीकडे शनिवारी दुपारी बैठकीनंतर राज्यसभेवर जाण्यासाठी मंत्री छगन भुजबळ तयार झाले पण त्यांनी एक अट घातली आहे. या अटीवर सीएम देवेंद्र फडणवीस निर्णय घेणार असून त्यांना भाजप हायकमांडकडून याबाबत अद्याप ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. त्याला २४ तास उलटले असल्याने सस्पेन्स कायम असून धाकधूक वाढली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वाट्याला आलेल्या राज्यसभेच्या जागेवर उमेदवारी कॊणाला याबाबतचा निर्णय झालेला नाही. दोन दिवसापासून बैठकांचे सत्र सुरु आहे. त्यामुळे या जागेवर कोणत्या नेत्याला संधी मिळणार, याचा पेच अद्याप सुटलेला नाही. या जागेसाठी छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर आहे. राज्यसभेवर जाण्यास भुजबळ तयारही आहेत. त्यासाठी मात्र त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत अट घातली आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोंहचली आहे.

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मी राज्यसभेवर गेल्यानंतर माझ्या जागी पुतण्या समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात घ्यावे, अशी मागणी बैठकीत केली. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी समीर भुजबळ यांना कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ द्यावी, त्यानंतर मी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करेन, अशी अट ठेवली आहे. त्यानंतर शनिवारी पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

या भेटीवेळी या नेतेमंडळींनी फडणवीसांकडे तसा आग्रह केला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करुन यांसदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिल्याचे समजते. छगन भुजबळांच्या अटीला २४ तास उलटून देखील अद्याप भाजप हायकमांडकडून ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. त्यामुळे फडणवीसांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप हायकमांडने भुजबळांच्या प्रस्तावाला होकार दर्शविल्यास ते सोमवारी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील, असेही सांगितले जाते.

शनिवारी दुपारी दीड वाजता राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन भुजबळांची राज्यसभेची उमेदवारी आणि राज्यातील मंत्रीपदाबाबतची भूमिका याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. मुख्यमंत्र्यांकडून मंत्रीपदाच्या फेर बदलाबाबत हायकमांडकडे विचारणा करावी लागेल, असे सांगण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस छगन भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यास तयार आहे. मात्र, त्यांच्याकडून घालण्यात आलेल्या अटीमुळे अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आली नसल्याची माहिती एका राष्ट्रवादीमधील नेत्याने दिली आहे.

दरम्यान, दुसरीकडे राज्यसभेच्या उमेदवारीसाठी भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा देखील इच्छुक असून गेल्या चार दिवसापासून त्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी प्रमोद हिंदुराव, अविनाश आदिक, समीर भुजबळ यांची नाव चर्चेत आहेत, असे समोर येत आहे. आता राज्यसभेची लॉटरी कुणाला लागणार याची उत्सुकता लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT