sharad pawar ajit pawar dhananjay munde jitendra awhad sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar : "पवारांचं घर फोडण्याचं काम आव्हाडांनी केलं", धनंजय मुंडेंच्या आरोपावर शरद पवार म्हणाले...

Akshay Sabale

मंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) आमदार जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य केलं होतं. पवारांचं घर फोडण्याचं आणि शरद पवार, अजित पवारांमध्ये अंतर आणायचं काम जितेंद्र आव्हाडांनी केलं, असा आरोप धनंजय मुंडेंनी केला होता. याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "आव्हाडांनी काय बोलावं, याचं अन्य लोकांनी मार्गदर्शन करण्याची गरज नाही," असं म्हणत पवारांनी मुंडेंना फटकारलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. ( Sharad Pawar Reply Dhananjay Munde )

धनंजय मुंडे काय म्हणाले होते?

"खऱ्या अर्थानं पवारांचं घर फोडण्याचं आणि शरद पवार, अजित पवारांमध्ये अंतर आणायचं काम जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे. याचे पुरावे देण्यासाठी माझ्यासह अनेकजण पुढे येतील. जयंत पाटील आणि सुप्रिया सुळेंना बाजूला सारून जितेंद्र आव्हाड पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपबरोबर जाताना शरद पवारांच्या संमतीनं जितेंद्र आव्हाडांची सही ५३ आमदारांमध्ये होती का नव्हती? याचं उत्तर अद्याप देण्यात आले नाही," असा प्रश्नही धनंजय मुंडेंनी उपस्थित केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आव्हाडांना"

धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर शरद पवारांना विचारण्यात आलं. त्यावर पवार म्हणाले, "धनंजय मुंडेंच्या पूर्वीपासून जितेंद्र आव्हाड पक्षासाठी काम करत आहेत. जितेंद्र आव्हाडांनी देशपातळीवर काम करत तरुणांचं नेतृत्व केलं. विधिमंडळ आणि मंत्रिमंडळातही आव्हाडांनी काम केलं आहे. त्यामुळे पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आव्हाडांना आहे. आव्हाडांनी वेगळी भूमिका घेतली, असं नाही. जितेंद्र आव्हाडांनी काय बोलावं, याबद्दल अन्य लोकांनी मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नाही."

"अजित पवारांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न"

'कुटुंबातील सर्वजण माझ्याविरोधात गेले आहेत,' असं वक्तव्यही अजित पवारांनी केलं होतं. याकडे शरद पवारांचं लक्ष वेधलं असता, त्यांनी म्हटलं, "निवडणुकीत मतदारांची साथ मागण्याचा अधिकार उमेदवाराला आहे; पण कुटुंबातील सगळे लोक एका बाजूला आणि मीच एकटा सांगणं, याचा अर्थ भावनात्मक भूमिका मांडून जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न दिसतोय."

"आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार"

"राष्ट्रवादी पक्षाची स्थापना कुणी केली, हे सगळ्या देशाला माहिती आहे. तरीसुद्धा पक्ष दुसऱ्यांना देणं हा अन्याय आहे. आयोगाचा निर्णय अन्यायकारक आहे. विधानसभा अध्यक्ष वेगळा निर्णय देणार नाही, याची खात्री होती. शिवसेनेबरोबरही त्यांनी असाच निर्णय घेतला. आता आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे," असं शरद पवार म्हणाले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT