UNESCO Recognition for Shivaji Maharaj’s Forts : संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान असलेले आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गडांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. ही बातमी सर्व शिवप्रेमींसाठी अतिशय सुखद अशी आहे.
महाराजांच्या 12 गडांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह जवळपास सर्वच नेत्यांनी ही बाब महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असल्याचं म्हटलं आहे. अशातच आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
तसंच त्यांनी या पोस्टमधून युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत गडांचा समावेश करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती देखील दिली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, "अभिमानास्प छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गडांचा युनेस्को च्या जागतिक वारसा यादी (World Heritage Sites) मध्ये समावेश झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट हे युद्धशास्त्रीय वास्तुकलेचा अद्वितीय वारसा असून जगात इतरत्र कुठेही असे गडकोट पाहायला मिळत नाहीत. हीच बाब ध्यानात घेऊन महाराष्ट्रातील गडकोट जागतिक स्तरावर पोहोचावेत, या उद्देशाने युनेस्को च्या जागतिक वारसा यादीत त्यांचा समावेश व्हावा यासाठी सन 2015 पासून मी प्रयत्नशील होतो.
याच प्रयत्नांचा भाग म्हणून 2016 व 2017 साली युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय तज्ञ समितीस महाराष्ट्रात निमंत्रित करून राज्यातील गडकोटांची प्रत्यक्ष माहिती दिली होती. युनेस्कोच्या आवश्यक निकषांची पूर्तता करण्यासाठी तत्कालीन सरकारकडेही मी वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
याकरिता ज्यांनी राजस्थान मधील किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचे नामांकन मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली त्या डॉ. शिखा जैन यांची मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यासाठी देखील मी आग्रही होतो," असं त्यांनी सांगितलं. तर राज्य सरकारनेही गडांचा समावेश जागतिक वारसा यादीत व्हावा यासाठी सकारात्मक प्रतिसाद देत योग्य पावले उचलली. या सर्वांचे फलित म्हणून आज महाराजांचे 12 गडकोट जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले.
याबद्दल मी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री श्री आशिष शेलार, तत्कालीन सांस्कृतिक कार्य मंत्री श्री विनोद तावडे, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे व प्रशासनाचे मन:पूर्वक आभार व्यक्त करतो, अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारचे आभार मानले.
महाराष्ट्रातील रायगड, राजगड, पन्हाळगड, प्रतापगड, शिवनेरी, लोहगड, सिंधुदुर्ग, साल्हेर, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडू येथील स्वराज्याची तिसरी राजधानी राहिलेला जिंजी किल्ला अशा बारा किल्ल्यांचा वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश झाल्याचं त्यांनी सांगितलं.
शिवाय युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचे नामांकन मिळाल्याने हे किल्ले जागतिक पर्यटन स्तरावर आले आहेत. यामुळे आपला उज्ज्वल इतिहास जागतिक स्तरावर पोहोचण्याबरोबरच पर्यटनवाढ, स्थानिक रोजगार निर्मिती आदी बाबींनाही चालना मिळेल.
मात्र, युनेस्कोकडून या स्थळांच्या विकासासाठी कोणताही निधी दिला जात नाही. त्यामुळे या गडकोटांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने आणखी ठोस पावले उचलणे आता अत्यावश्यक असल्याची आठवण संभाजीराजेंनी यावेळी सरकारला करून दिली.
या गडकोटांच्या संवर्धनासाठी योग्य निधीची तरतूद करून जतन, संवर्धन व विकासाची दिशा ठरविणे आवश्यक आहे. या बारा किल्ल्याच्या संवर्धनावर अधिक भर देऊन इतरही किल्ल्यांचे संवर्धन कार्य राज्य सरकारने हाती घ्यावे व उर्वरीत किल्लेही या यादीत समाविष्ट होतील यादृष्टीने प्रयत्नशील राहावे, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.